
वर्धा : अपारंपरिक ऊर्जा हा आता परवलीचा शब्द ठरत आहे. अपारंपरिक उर्जा असलेल्या सौर ऊर्जा ही अत्यंत महत्त्वाची असून त्याचा अधिकाअधिक वापर व्हावा यासाठी पंतप्रधान मोफत सूर्यघर ही योजना केंद्र सरकारमार्फत राबविण्यात येत आहे. केंद्राच्या या योजनेच्या अनुषंगाने मॉडेल सोलर व्हिलेज वर्धा विद्युत विभागाने पुढाकार घेत लोकशक्तीतून गावाचा विकास करण्याचा प्रयत्न प्रत्यक्षात उतरवत हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट ( राठी) या गावातील सर्व घरे आता सौर ऊर्जेत न्हावून
निघत असल्याचे चित्र पहायवास मिळत आहे.
हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट (राठी) या गावात सौर उर्जेचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर ७० घरे व अवघी १८७ लोकसंख्या असलेल्या या गावात २८ टीनाची व कौलारू घरे आहेत. ही सर्व घरे आता सौर उर्जेच्या माध्यमातून उजळली आहेत.
औद्योगिक वसाहतीला लागूनच असलेल्या या गावात हा उपक्रम राबविताना सुरुवातीला विविध अडचणी आल्या होत्या. परंतु कार्यकारी अभियंता हेमंत पावडे यांनी चंग बांधला. बँक ऑफ बडोदाची मदत घेण्यात आली. नंतर अधिकारी वर्गाने गावात कार्यशाळा घेणे सुरू केले. सौर ऊर्जा किती फायद्याची व कसलाच धोका नसल्याची बाब गळी उतरविण्यात ते सर्व यशस्वी झाले. मग लाभार्थी गावाकऱ्यांना थेट लाभ कसा मिळवून देता येइल, यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले. अवघ्या तीन महिन्यात सर्व काम पूर्णत्वास गेले आणि चिचघाट हे विदर्भातील पहिले आदर्श सौरग्राम ठरले. हे गाव आता शंभर टक्के सौर उर्जेंवरच चालणार असल्याने आनंद व्यक्त केले जात आहे.
आता जिल्ह्यातील अन्य गावे सौर ऊर्जामय करण्याचा मानस विद्युत विभागाने ठेवला आहे. चिचघाट ही सुरुवात असल्याचे ते म्हणतात. खरे तर कौलारू व टीनाच्या झोपड्यात ही प्रणाली कशी अमलात आणायची हा मोठा पेच होता. मात्र गावकऱ्यांचा प्रतिसाद व उत्साहामुळे या समस्या लवकरात लवकर सुटल्या. लाभार्थी होण्यासाठी व्यक्तिगत आर्थिक योगदान आवश्यक असते. म्हणून ती बाब मोठी अडसर ठरली होती. पण त्यासाठी कर्ज मिळाले.
चिचघाट (राठी) गावाची प्रेरणा महत्त्वाची
शासनाच्या जन समर्थ या पोर्टल मार्फत सौर प्रकल्पसाठी आवश्यक अर्थसहाय्य बँक ऑफ बडोदाने उपलब्ध करून देत अडचण दूर केली. म्हणून या सौर प्रकल्पास १०० टक्के आर्थिक सहकार्य लाभले, ही महत्त्वाची बाब असल्याचे विद्युत विभागाचे अधिकारी सांगतात. असे अडथळे पार करीत चिचघाट (राठी) हे विदर्भात अव्वल आले. या गावाची प्रेरणा अनेक गावांना मिळू शकते, असा विश्वास व्यक्त केला जातो.