
मुंबई : बीड, परभणीतील घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. आरोपींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र महायुतीचे सरकार या प्रकरणी कारवाईचा बनाव करत आहे. या प्रकरणाच्या चौकशीतून काय उत्तर समोर येणार हे जगजाहीर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड परभणीतील प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या दोन दिवसांच्या नव सत्याग्रह कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बेळगावात पोहचले असताना प्रसार माध्यमांशी बोलत होते. या दोन्ही घटनांवर जनतेने व सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी वस्तुस्थिती मांडली आहे पण भाजपा युती सरकार ते मान्य करत नाही, हे सरकार प्रायोजित असल्याने सीआयडी चौकशी केली तरी त्यातून काही निष्पन्न होणार नाही, अशी टीका त्यांनी केली.