मुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याबाबत निवडणूक आचारसंहितेचा अडसर दूर करून निवडणूक आयोगाला विनंती करून याबाबत अधिकारी स्तरावर बैठक घेऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंगोली जिल्ह्यातील हादगाव येथे शिवसेनेचे उमेदवार बाबूराव कदम यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी कार्यकर्ता मेळाव्यात संबोधित करताना त्यांनी या भागात झालेल्या अवकाळी पावसाची आपल्याला पूर्ण जाणीव असून स्थानिक शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी झालेल्या नुकसानाची माहिती आपण जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने सुरू करून त्यांना दिलासा देण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या तीन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाडा आणि खान्देशच्या भागात सोसाट्याचा वारा, विजांच्या गडगडडाटासह गारपीट आणि आवकाळी पाऊस पडला आहे. या पावसाचा फटका या भागातील शेतकऱ्यांना बसला आहे. तसेच उन्हाळी मूग, भुईमूग, ज्वारी, गहू या पिकांना देखील त्याचा फटका बसला आहे.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना आलेल्या या अस्मानी संकटाचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसला आहे. मात्र निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे बैठक घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यात सरकारची मोठी अडचण झालेली आहे.