
देशाच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. हा निर्णय उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या निकालानंतर उद्धव ठाकरे गटाची आगामी रणनीती काय असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आठ महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंडखोरी केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केला. त्यानंतर गेल्या आठ महिन्यांपासून निवडणूक आयोगात सुनावणी सुरू होती. आता सुनावणी पूर्ण झाली असून निवडणूक आयोगाने बहुमताच्या जोरावर हा निर्णय दिला आहे. या निर्णयाचे शिंदे गटाकडून स्वागत होत आहे. या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढण्याचे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत.
निवडणूक आयोगाने ठाकरे आणि शिंदे गटाला खरी शिवसेना कोण आणि धनुष्य बाण कोणाचे निवडणूक चिन्ह याबाबत आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी दोन्ही गटांनी पक्षाचे पदाधिकारी आणि अन्य महत्त्वाच्या नेत्यांचा पाठिंबा असल्याचे सिद्ध करावे, असेही निवडणूक आयोगाने सांगितले होते. त्यानंतर दोन्ही गटांनी पदाधिकाऱ्यांनी पाठबळ दिलेली कागदपत्रे निवडणूक आयोगासमोर सादर केली.
दरम्यान, या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “लोकशाहीत बहुमत महत्त्वाचे असते. आज राज्यात बहुमताचे सरकार स्थापन झाल्याचे आपण पाहिले आहे. हा बहुमताचा विजय आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा हा विजय आहे, असे मी पुन्हा एकदा सांगतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले.