संभाजीनगरमध्ये दोन गटात तुफान राडा ; पोलिसांच्या गाड्या जाळल्या

संभाजीनगरमध्ये दोन गटात तुफान राडा ; पोलिसांच्या गाड्या जाळल्या

नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे

छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्री दोनच्या दरम्यान दोन गटात झालेल्या दंगलीत अनेक गाड्या पेटवण्यात आल्या. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना गोळीबार आणि अश्रुधुराचा वापर करावा लागला. तर एक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. रात्री पोलिसांच्या गाड्याही जमावाने जाळल्या. शहरातील किराडपुरा भागात ही दंगल घडली. राम मंदिराजवळ युवकांमध्ये बाचाबाची झाली, त्यानंतर दगडफेक करण्यात आली. पुढे जाळपोळ आणि चकमक सुरूच राहिली. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या घटनेची माहिती मिळताच किराडपुरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच संभाजीनगरमधील सर्व पक्षांच्या नेत्यांनीही नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. संपूर्ण परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, “रात्री जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला आणि आता परिस्थिती शांत झाली आहे. संबंधित गुन्हेगारांवर पोलीस कडक कारवाई करतील, असे छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी सांगितले.

पोलिस आयुक्त निखिल गुप्ता म्हणाले की, संभाजीनगरमध्ये लोक एकोप्याने राहतात, शांतता आणि चांगले वातावरण राहण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे. कालच्या घटनेप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यात सहभागी असलेल्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in