
यंदा जून अर्धा संपला तरी पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांसह सरकारलाही धडकी भरली आहे. पण, आता भारतीय हवामान खात्याने आनंदाची बातमी दिली आहे. मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून तो लवकरच पुढील वाटचालीला सुरूवात करेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. १८ ते २१ जूनदरम्यान दक्षिण द्वीपकल्प आणि पूर्व भारत आणि लगतच्या काही भागांमध्ये नैऋत्य मोसमी वारे आणखी पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे, असे हवामान खात्याने सांगितले.
पुढील आठवड्यात महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल. मान्सून पुढे सरकण्यासाठी आता अनुकूल वातावरण तयार झाले आहे. बिपरजॉय चक्रीवादळ व अरबी समुद्रातील ‘एल निनो’ प्रभावामुळे पावसाला विलंब झाला आहे. हवामान तज्ज्ञ राजेश कपाडिया यांनी सांगितले की, १९ जूनपर्यंत मान्सून व्यवस्थित पडणार नाही. सध्याचा मान्सून वरवरचा आहे. तो अधिक तीव्र होण्याची गरज आहे.
‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे मुंबई शहरात मान्सूनपूर्व सरी कोसळल्या. शहरातील वातावरण काही काळ ढगाळ राहणार असून सोसाट्याचा वारा कायम राहणार आहे. मात्र, चक्रीवादळाचा मुंबई शहरात फारसा परिणाम होणार नाही.