नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) ‘महादेवी’ हत्तीण पुन्हा नांदणीत यावी, अशी जनभावना आहे. ही जनभावना लक्षात घेऊन नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. राज्य शासनही स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात हत्तीणीला परत देण्यासंदर्भात भूमिका मांडेल, असे सांगून याप्रकरणी राज्य शासन पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्य शासनाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, वन मंत्री गणेश नाईक, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह नांदणी मठाचे प्रतिनिधी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
‘ते’ गुन्हे मागे घेणार
‘महादेवी’ हत्तीणीला परत आणण्यासाठी कोल्हापूरवासीयांनी आंदोलन केले. तिला घेऊन जात असताना वनतारा संग्रहालयातील गाड्यांवर दगडफेक व तोडफोड केली. या प्रकरणात सुमारे १४० जणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.