सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत स्थगित

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचा निर्णय
सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत स्थगित

कराड : राज्यभरातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पावसाळी हंगामाचा विचार करता येत्या ३० सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने घेतला आहे. प्रक्रीया सुरू असलेल्या संस्थांच्या निवडणुका आहे त्या टप्प्यावर थांबविण्याचा आदेश प्राधिकरणाने दिला आहे. त्यामुळे प. महाराष्ट्रातील भोगावती साखर कारखाना, महालक्ष्मी, वारणा, पंचगंगा, मलकापूर अर्बन, भरत आदी बँकासह दिग्गज नागरी पतसंस्था आदींसह अन्य संस्थांच्या निवडणुकांना ब्रेक लागणार आहे.

राज्यातील सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, निवडणूक प्रक्रीयाही सुरू आहे. पण राज्यात ३० जूननंतर मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात होते. त्यामुळे ज्या संस्थांची निवडणूक प्रक्रीया सुरू आहे त्यांचे कामकाज पूर्णपणे पावसाळ्यात होणार आहे.

याकाळात पर्जन्यवृष्टीचे प्रमाण अधिक असल्याने उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती, जनजीवन व वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता, पावसानंतर जनजीवन पुर्वपदावर येण्यासाठी लागणारा कालावधी आणि सहकारी संस्थांमधील सभासद शेतकरीही सध्या खरीप हंगामाच्या शेतीकामात व्यस्त आहेत. यासर्व बाबींचा विचार करता जास्तीत जास्त मतदारांना निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवता यावा, यासाठी निवडणूक पात्र असणाऱ्या आणि प्रक्रिया सुरू असलेल्या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात येत असल्याचा अध्यादेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने काढला आहे.


'या' संस्थांच्या निवडणुका होणार

उच्च न्यायालयाने आदेश दिलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका याकाळात होणार आहेत. तसेच २५० किंवा त्यापेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था आणि ज्या संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे, पण अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची निवड होणे बाकी आहे, अशा संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in