
पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानात वाढ झाली असून राज्यातून थंडी गायब झाली आहे. राज्यातील अनेक भागात पहाटेचे तापमान १६ ते १८ अंशांपर्यंत पोहोचले आहे. गेल्या दोन दिवसांपासून तापमानात १ ते २ अंशांनी वाढ झाली आहे. तसेच किमान तापमानात वाढ होऊन तो ११ ते २० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचला आहे. मुंबईत किमान तापमान २२ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले असून आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमाल तापमान २५ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वायू प्रदूषणाची पातळी जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे.
सध्या चक्राकार वारे उत्तर पाकिस्तान तसेच पश्चिम राजस्थानमध्ये आहेत. पश्चिमी चक्रवाताचा सक्रिय प्रभाव असल्यामुळे पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, महाराष्ट्रामध्ये पुढचे पाच दिवस कोरड्या वाऱ्यांचा प्रवाह सक्रिय असणार आहे, असे पुणे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.