कंपनी सचिवांचा देशाच्या विकासात महत्वाचा वाटा आहे. कंपनी सचिव हे कंपनी मालक व सीईओ यांना वास्तविक सल्ला देतात. भारतामध्ये ४० टक्के डिजिटल व्यवहार होत आहेत. तसेच क्रीप्टोकरन्सीला परवानगी दिली नाही, परंतु डिजिटल करन्सी आपण आणणार आहोत. संपूर्ण जगाच्या तुलनेत भारतामध्ये दोनतृतीयांश स्टार्टप कंपनी आहेत, असे प्रतिपादन अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले आहे.
इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरीज (आयसीएसआय) औरंगाबाद चॅप्टर व वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय शिखर परिषद औरंगाबाद जिमखाना क्लब येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कराड बोलत होते.
यावेळी सन्माननीय अतिथी सीएस देवेंद्र देशपांडे (राष्ट्रीय अध्यक्ष, आयसीएसआय) व श्रीकांत बडवे (व्यवस्थापकीय संचालक, बडवे ग्रुप), सीएस राजेश तरपरा (WIRC अध्यक्ष), सीएस अशिष करोडिया ( पिडीसी अध्यक्ष डब्लूआयआरसी - आयसीएसआय), सीएस समृद्धी लुनावात (अध्यक्षा), सीएस अनिकेत कुलकर्णी ( सचिव), सीएस कोमल मुथा (उपाध्यक्ष), सीएस परेश देशपांडे (पिडीसी-अध्यक्ष) , सीएस सागर देव, सीएस प्रसाद टाकळकर व सीएस रश्मी गंगवाल तसेच औरंगाबादचे कंपनी सेक्रेटरीज् मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आयसीएसआय यांच्याकडून स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड, महाराष्ट्र नॅशनल लॉ विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या बरोबर सामंज्यस्य करार करण्यात आला, अशी माहिती सीएस लुनावात यांनी कार्यक्रम प्रसंगी दिली. सामंज्यस्य कराराचा फायदा मराठवाड्यामधील सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक यांना होणार आहे. या कारारामुळे विद्यार्थ्यांना कंपनी सचिव अभ्यासक्रमाबद्दल माहिती विद्यापीठात मिळेल. तसेच विद्यार्थ्यांचा विकास होण्यास मदत होईल. कंपनी सचिव यांना विद्यापीठामध्ये पीएचडी प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
या एकदिवसीय परिषदेमध्ये सीएस दिवेश पटेल व सीएस के. व्यंकटरमण यांचे टेक्निकल सत्र व सिडीएसएल आर्थिक साक्षरता सत्र घेण्यात आले. तसेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज यांनीही कार्यक्रमास सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीएस जस्विन बिंद्रा व सीएस अंजली बुधानी यांनी केले तर सीएस अनिकेत कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले.