

मुंबई : विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाला अंधारात ठेवून परस्पर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या दोन उमेदवारांवर शुक्रवारी काँग्रेसने हकालपट्टीची कारवाई केली. यवतमाळ विधानपरिषद मतदारसंघातील उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा मतदारसंघातील उमेदवार शैलेश अग्रवाल यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे.
या दोन मतदारसंघांत काँग्रेस उमेदवाराच्या माघारीमुळे महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. काँग्रेस उमेदवारांच्या अर्ज माघारीच्या कृत्याची गंभीर दखल घेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही कारवाई केली. पक्षाने कांबळे आणि अग्रवाल या दोघांचे पक्ष सदस्यत्वही रद्द केले आहे.