

लातूर : ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील यांच्या पार्थिवावर शनिवारी महाराष्ट्रातील त्यांच्या मूळ जिल्हा लातूर येथे पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि कर्नाटकचे मंत्री ईश्वर खंड्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटील यांचे पार्थिव वरवंटी येथील त्यांच्या शेतात दफन करण्यात आले. पाटील यांचे शुक्रवारी लातूर येथे अल्पशा आजाराने निधन झाले. सुमारे ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी लोकसभा अध्यक्षपदासह केंद्र सरकारमध्ये विविध मंत्रालयांची जबाबदारी सांभाळली.
ओम बिर्ला यांनी पाटील यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि लातूरचे खासदार शिवाजी कोळगे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. अंत्यसंस्कारांपूर्वी पाटील यांना बंदुकीची सलामी देण्यात आली.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिवंगत नेत्यासोबतच्या आपल्या संबंधांची आठवण करून देताना सांगितले की, १९६७ मध्ये ते आमदार झाले तेव्हा त्यांची पाटील यांच्याशी - पहिली भेट झाली. आमचे अतिशय जवळचे संबंध होते. ते - विद्वान, सद्गुणी व्यक्तिमत्त्व होते. देशासाठी नेहमी विचार - आणि कृती करणारे नेते होते. मराठवाड्यासाठीही त्यांनी पूर्ण ताकदीने चांगले कार्य केले," असे खर्गे म्हणाले.
शिवराज पाटील यांनी १९६७ मध्ये लातूर नगरपालिकेचे सदस्य म्हणून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. २०१० ते २०१५ या काळात ते पंजाबचे राज्यपाल आणि - चंदीगडचे प्रशासक होते.