नागपूरमधून काँग्रेस फुंकणार लोकसभेचे रणशिंग; वर्धापनदिन कार्यक्रमाला सोनिया, राहुल, प्रियांका गांधी उपस्थित राहणार

विविध राज्यांतील काँग्रेसचे मुख्यमंत्री या रॅलीला उपस्थित राहणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
नागपूरमधून काँग्रेस फुंकणार लोकसभेचे रणशिंग; वर्धापनदिन कार्यक्रमाला सोनिया, राहुल, प्रियांका गांधी उपस्थित राहणार
PM

मुंबई : काँग्रेस पक्षाचा १३८ वा वर्धापन दिन नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. २८ डिसेंबर हा काँग्रेस पक्षाचा स्थापना दिन. यानिमित्ताने काँग्रेसने  नागपूरमध्ये ‘है तैयार हम’ या महारॅलीचे आयोजन केले असून याद्वारे काँग्रेस लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह विविध राज्यांतील काँग्रेसचे मुख्यमंत्री या रॅलीला उपस्थित राहणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, स्वातंत्र्य चळवळीत डिसेंबर १९२० मध्ये नागपूरच्या भूमितूनच महात्मा गांधी यांनी जुलमी, अत्याचारी ब्रिटिश सत्तेविरोधात असहकार आंदोलनाचा नारा दिला होता. शेवटी १९४७ मध्ये ब्रिटिशांना भारत देश सोडून पळून जावे लागले, हा इतिहास आहे. नागपूर हे देशातील मध्यवर्ती ठिकाण आहे. नागपूरमधूनच १९५९ मध्ये इंदिरा गांधी यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याची घोषणा केली गेली होती. अशा ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या नागपूर शहरात काँग्रेसचा १३८ वा स्थापना दिवस साजरा होत आहे, ही काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी महत्वाची व आनंदाची बाब आहे. ज्या मैदानात हा मेळावा होत आहे, त्याला ‘भारत जोडो मैदान’ असे नाव दिले असून ‘है तैयार हम’ अशी या महारॅलीची संकल्पना आहे. या मेळाव्याची सर्व तयारी झाली असल्याचे ते म्हणाले.

आज देशात लोकशाही व संविधान संपवण्याचे काम केले जात आहे, भाजपच्या सरकारने अत्याचारी व्यवस्था निर्माण केली आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगार यांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. भाजपा सरकारने निर्माण केलेल्या या अत्याचारी व्यवस्थेला संपवण्यासाठी, भ्रष्टाचारमुक्त भारत, अत्याचारमुक्त भारत निर्माण करण्याबरोबरच रोजगार निर्मिती करणे, महागाई कमी करणे, शेतकरी, कामगार यांना न्याय देणे, लोकशाही व संविधान वाचवणे, हे काँग्रेस पक्षाचे दायित्व आहे आणि त्यासाठीच ‘है तैयार हम’ अशी संकल्पना मांडलेली आहे. 

मुख्यमंत्री असताना मोदी

ईव्हीएमला करत होते विरोध

ईव्हीएम संदर्भात पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, ‘‘ईव्हीएमवर लोकांमध्ये संशय आहे, त्याची दखल निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे. लोकांना वाटते त्यांचे मत दुसऱ्या पक्षाला जाते त्याचा गांभिर्याने विचार झाला पाहिजे. मतदान पत्रिकेवर मतदान घ्यावे, ही जर लोकांची मागणी असेल तर त्याची दखल केंद्र सरकार व निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना हेच नरेंद्र मोदी ईव्हीएमला विरोध करत होते, असेही पटोले म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in