

कोल्हापूर : ग्रामीण डाक पुरस्कारार्थी आपल्या विश्वासार्हतेच्या जोरावर देशात वेगळी ओळख निर्माण करतात, असे केंद्रीय दूरसंचार तसेच ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी व्यक्त केले.
पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित ग्रामीण डाक सेवक (GDS) संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, डाक सेवा महासंचालक जितेंद्र गुप्ता, महाराष्ट्र सर्कल मुख्य पोस्ट मास्टर अमिताभ सिंग, पोस्टल सर्विसेस बोर्डचे सदस्य सुवेंदुकुमार स्वैन, पुणे रिजनचे संचालक अभिजीत बनसोडे आणि गोवा रिजनचे संचालक रमेश पाटील उपस्थित होते.
सिंधियांनी सांगितले की, सार्वजनिक क्षेत्रातील सर्वाधिक विश्वासार्हता पोस्ट विभागाने मिळवली आहे. आधार कार्ड, बचत, पासपोर्ट, गुंतवणूक अशा सेवांमध्ये पोस्ट विभागाने उल्लेखनीय कार्य केले आहे. ग्रामीण भागात पोस्टमनना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, तरीही ते कर्तव्यात कसूर करत नाहीत. देशात सध्या ३७कोटी पोस्ट खाते असून त्यापैकी २१ कोटींची बचत करण्यात आली आहे.
देशभरात १,६५,००० ग्रामीण डाक वितरण केंद्रे कार्यरत आहेत. कार्यक्रमात सिंधियांच्या हस्ते सन २०२४-२५ या वर्षातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दहा डाक सेवकांचा सन्मान करण्यात आला.
यामध्ये सुहास पाटील, सुरेश नरके, शशिकांत महाजन, रोहिणी कंधारे, अमृता शेरेकर, अजीज मुजावर, महेंद्र पाटील, राजेंद्र शिंदे, जगन्नाथ राऊत आणि नागनाथ गायकवाड यांचा समावेश होता. सन्मानात लाल जॅकेट, टोपी, पोस्ट विभागाची बॅग, सन्मान चिन्ह (पत्र पेटी) व प्रमाणपत्र देण्यात आले.
सन्मानित व्यक्तींनी आपले अनुभव सांगितले आणि पोस्ट विभागाची मान उंचावण्यासाठी सदैव कार्यरत राहण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सालेलकर, तर आभार प्रदर्शन अमिताभ सिंग यांनी केले. या कार्यक्रमाला राज्यभरातील सुमारे ६,००० डाक कर्मचारी उपस्थित होते.
जनतेशी खऱ्या अर्थाने नाळ जोडलेला विभाग म्हणजे डाक विभाग, आणि पोस्टमन हे समाजाच्या विश्वासार्हतेचे प्रतीक आहेत.
श्रीमंत शाहू महाराज, खासदार
देशात नवीन ११,००० पोस्टांची निर्मिती करण्यात आली आहे. पोस्टमनवर आजही जनता विश्वास ठेवते, ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे.
धनंजय महाडिक, खासदार