शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्राची घोषणा हवेतच; अंबादास दानवे यांची टीका

पावसाच्या नुकसानीची मदत सरकारने जाहीर केली; मात्र, अद्याप एकाही शेतकऱ्याला ती मदत मिळाली नाही.
शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्राची घोषणा हवेतच; अंबादास दानवे यांची टीका
PM

मुंबई : गेल्या ४८ तासांत यवतमाळ जिल्ह्यात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दुष्काळ, सततची नापिकी याने शेतकरी त्रस्त असून, सरकार सत्तेत आल्यापासून आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याच्या घोषणा करत आहे; मात्र वाढत्या शेतकरी आत्महत्येच्या घटना पाहता सरकारने केलेल्या घोषणा हवेत विरली आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी येथे केली.

पावसाच्या नुकसानीची मदत सरकारने जाहीर केली; मात्र, अद्याप  एकाही शेतकऱ्याला ती मदत  मिळाली नाही. राज्य सरकारने केवळ जाहिरातीद्वारे मदत  प्रसिद्ध केली आहे. हे आकडे केवळ कागदावरच राहिले आहेत, असेही दानवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात कुपोषणाचा दर उंचावला आहे. शासन आपल्या दारी हा उपक्रम नेमका सर्वसामान्यांच्या दारी की कंत्राटदार, उद्योजकांच्या दारी आहे तेच कळत नाही. हे सरकार शेतकरी आत्महत्या, कुपोषण रोखण्यास हे सरकार अपयशी ठरले आहे. उद्योग विभागाने आज विविध वर्तमानपत्रात जाहिरात देऊन गुंतवणूकीची माहिती दिली आहे. मात्र, एखाद्या कंपनीसोबत करार केला म्हणजे गुंतवणूक झाली असं होतं नाही, असा टोला दानवे यांनी लगावला.

विश्वगुरू म्हणून मिरवणारा भारतीय जनता पक्ष जनतेचे प्रश्न सोडविण्यात सपशेल अपयशी ठरला आहे. त्यामुळेच सध्या ते राम मंदिराच्या मुद्द्यावर भावनिक फुंकर घालून राजकारण करत आहेत. इंडिया आघाडी भ्रष्टाचार, बेरोजगारी, महागाई यावर निवडणुका लढेल. तसेच शिंदे गटातील अनेक खासदार हे भाजपच्या चिन्हावर लढणार आहेत. त्या उमेदवारांना भाजप गिळून टाकेल, असा दावाही त्यांनी केला.

तर लोकसभा लढवू

पक्षप्रमुखांनी आदेश दिला, तर आपली लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचेही अंबादास दानवे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in