२२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा; चंद्रशेखर बावनकुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

२२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा; चंद्रशेखर बावनकुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल ऐतिहासिक आहे, असे सांगून ते म्हणाले की, “जे नियम शिवसेनासाठी लागू झाले तेच राष्ट्रवादीसाठी लागू होतील

नागपूर : अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारीला प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या दिवशी भारतातील कोट्यवधी भारतीय घरोघरी दिवे लावून दिवाळी साजरी करणार असून ही जगातली सर्वांत मोठी दिवाळी ठरेल. या उत्सवासाठी राज्यात २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

कोराडी (नागपूर) येथे बावनकुळे म्हणाले की, “काँग्रेसने राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण नाकारून देशातील कोट्यवधी रामभक्तांचा अपमान केला आहे. काँग्रेसची प्रभू रामचंद्रांविरोधातील मानसिकता पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे. यापूर्वी सुप्रीम कोर्टात काँग्रेसने प्रभू रामचंद्रांचे अस्तित्व नाकारले होते. आता पुन्हा एकदा कोट्यवधी भारतीयांच्या स्वप्नातील भव्य राम मंदिराचे उद्घाटन होत असताना दिलेले निमंत्रण नाकारून हिंदूविरोधी भूमिका घेतली आहे. काँग्रेसने रामायण काल्पनिक असल्याचा दावा केला होता. रामाच्या जन्माचे दाखले मागितले होते. ८ हजार वर्षांपूर्वी प्रभू श्रीरामाचा जन्म झाला होता, हे सांगण्यासाठी मोदींना पंतप्रधान व्हावे लागले. केवळ एका समाजाची मते मिळावी व त्या समाजाच्या राजकारणाकरिता वस्तुस्थिती लपवली. लाखो रामभक्तांच्या रक्ताने काँग्रेसचे हात माखले आहेत. देशातील रामभक्त काँग्रेसच्या या बहिष्काराचा बदला घेणार.”

विधानसभा अध्यक्षांचा निकाल मेरिटवर

विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल ऐतिहासिक आहे, असे सांगून ते म्हणाले की, “जे नियम शिवसेनासाठी लागू झाले तेच राष्ट्रवादीसाठी लागू होतील. सुप्रीम कोर्टाने, निवडणूक आयोगाने व विधानसभा अध्यक्षांनी ज्या मेरिटवर निकाल दिला तेच इतरांनाही लागू होतील. निकालावर सर्वच पक्षांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. निकालासाठी विधानसभा अध्यक्षांचे संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनंदन होत आहे. दुसरीकडे महाराष्ट्राचे वातावरण खराब करण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत.”

जागेबाबत कोणतीही तडजोड नाही

महायुतीचे १४ तारखेपासून बुथ, जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय मेळावे होणार आहेत. महायुतीच्या नेतृत्वाने एकच फार्म्युला ठरविला आहे, जी जागा जो पक्ष जिंकू शकतो त्यात कोणतेही तडजोड केली जाणार नाही. भाजपचा कोणताही आग्रह नाही, संसदीय मंडळ व राज्यातील तिन्ही नेते समन्वयाने जागाचा निर्णय घेतील, ज्याला जी जागा मिळणार तेथे ५१% मते मिळवून महायुतीचा विजय व्हावा, यासाठी भाजप ही शिंदे व अजित पवारांना ताकद देणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in