मुंबई : राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने तब्बल ३० जिल्ह्यात नुकसान झाले आहे. राज्यातील १७ लाख ८५ हजार ७१४ हेक्टर इतके क्षेत्र या पावसाने बाधित झाले आहे. आधीच शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही त्यात शेतातील पीकदेखील हातातून गेल्याने बळीराजा अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
“राज्यात मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. सोयाबीन, मका, कापूस या पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी. तसेच बँकेकडून शेतकऱ्यांची होणारी वसुली थांबवावी, पिक विमा कंपन्यांनी तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी,” अशी मागणी वडेट्टीवार यांनी या पत्रात केली आहे.
“मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे बळीराजा आस लावून बसला होता की, त्याला काही मदत मिळेल. पण या बैठकीत शेतकऱ्यांसाठी काही निर्णय झाला नाही. शेतकरी निराश झाला आहे. त्यांना तातडीने मदतीची गरज आहे. राज्यातील पंचनामे लवकर पूर्ण करून ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदतीची घोषणा करावी,” असे वडेट्टीवार म्हणाले.
‘‘राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने शेतकऱ्यांना झोडपून काढले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे उभे राहिलेले पीक जमीनदोस्त झाले आहे. पशुधन गेले आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याने त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले.