विठुरायाच्या गजराने देवाची आळंदी भारावली; संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

लाखो वारकऱ्यांच्या मांदियाळीत व पवित्र इंद्रायणीच्या साक्षीने आषाढी वारीसाठी आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने शनिवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

पुणे : जाईन गं माये तया पंढरपुरा। भेटेन माहेरा। आपुलिया।। असा मनी भाव, टाळ मृदंगाचा गजर... ज्ञानोबा तुकोबा नामाचा जयघोष... अशा भारलेल्या वातावरणात लाखो वारकऱ्यांच्या मांदियाळीत व पवित्र इंद्रायणीच्या साक्षीने आषाढी वारीसाठी आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने शनिवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.

‘अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र’, अशा शब्दांत ज्या आळंदीचे वर्णन केले जाते, त्या अलंकापुरीत जणू भक्तीचा सागरच लोटला होता. प्रस्थान सोहळा ‘याची देही, याची डोळा’ अनुभवण्यासाठी लाखो वारकरी आळंदीत एकवटले होते. त्यांच्या साक्षीनेच हा सोहळा रंगला. शनिवारी पहाटे चारला घंटानादाने आळंदी गाव जागा झाला. काकडा, अभिषेक, महापूजा, पंचामृतपूजा, दुधारती करण्यात आली. दुपारी प्रस्थान सोहळ्याची तयारी सुरू झाली. माऊलींच्या समाधीवर मुखवटा ठेवून तुळशीहार व गुलाबपुष्पांचा हार घालण्यात आला. दुपारी दोनच्या सुमारास रथापुढे व रथामागे असणाऱ्या मानाच्या दिंड्यांना महाद्वारातून मंदिरात प्रवेश देण्यास सुरुवात करण्यात आली. सर्व दिंड्या मंदिराला प्रदक्षिणा घालून पुढे पुढे सरकत होत्या. ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात, खांद्यावर पताका घेत, वीणा, टाळ-मृदंगाच्या गजरात, डोईवर तुळशी वृंदावन घेत वारकऱ्यांनी मंदिरात प्रवेश केला. वीणा, टाळ-मृदुंगाच्या गजराने माऊली, तुकारामांच्या जयघोषाने मंदिर व आजूबाजूचा परिसर भक्तिमय झाला होता. भक्तिरसात वारकरी, भाविक न्हावून निघाले.

सायंकाळी चारच्या सुमारास पालखी प्रस्थानाच्या मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली. श्रीगुरू हैबतबाबा यांच्यातर्फे श्रींची आरती झाली. त्यानंतर माऊली संस्थानतर्फे श्रींची आरती झाली. वैभवी चांदीच्या पादुका प्रस्थानासाठी पुष्पसजावटीने सजलेल्या चौथऱ्यावर वीणा मंडपात ठेवण्यात आल्या. चलपादुकांची विधिवत प्राणप्रतिष्ठा झाली. सर्वांच्या मुखी 'ज्ञानोबा तुकाराम', 'माऊली माऊली', 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' या नामाचा गजर सुरू होता. उत्तरोत्तर सोहळ्याची रंगत वाढतच गेली. सोहळा चालू असताना दिंड्यांमधील भगवे ध्वज डौलाने फडकत होते. त्यानंतर माऊलींचे मानाचे दोन अश्व मंदिरात आले आणि सोहळा प्रफुल्लित झाला. त्यानंतर मंदिरातून पालखी बाहेर आली आणि वारकरी, भक्तांचा आनंद गगनात मावेनासा झाला. टाळ, मृदंगाचा स्वर टिपेला पोहोचला. वारकरी नाचू, डोलू लागले. पालखी खांद्यावर घेण्यासाठी एकच झुंबड उडाली. या उत्साही वातावरणातच पालखीची मंदिराला प्रदक्षिणा झाली आणि पालखी मुक्कामासाठी आजोळी गांधीवाड्यात दाखल झाली. प्रस्थान सोहळ्यासाठी यावर्षी ४७ दिंड्यांना देऊळवाड्यात प्रवेश दिला गेला. प्रतिदिंडी ९० वारकरीच प्रस्थानासाठी मंदिरात येतील, अशी व्यवस्था यंदा करण्यात आली होती.

इंदायणी नदी सुधार योजनेसाठी ८०० कोटींचा निधी - मुख्यमंत्री

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त आळंदी येथे माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी बोलताना ते म्हणाले, इंद्रायणी प्रदूषणाचा मुद्दा सरकारने गांभीर्याने घेतला आहे. इंद्रायणी नदी सुधार योजना तातडीने कार्यान्वित करावी, अशी सूचना आम्ही केली आहे. ८०० कोटी रुपयांचे फंडिंगदेखील नदी सुधार योजनेसाठी महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आले आहे. नदी सुधारणा हे नैतिक कर्तव्य असून त्यासाठी तातडीने ठोस पावले उचलण्यात येणार आहेत.

या सोहळ्याला केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, पालखी सोहळाप्रमुख योगी निरंजननाथ, डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही खेळले फुगडी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आळंदीत माऊलींचे दर्शन घेतले. यावेळी वारकऱ्यांबरोबर फुगडी खेळण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्यासोबत फुगडी खेळली. यावेळी बारणे यांनी एकनाथ शिंदे यांना वाकून नमस्कार केला. शिंदे यांनीही बारणेंच्या पाठीवर थाप देत आशीर्वाद दिला.

असा पार पडला सोहळा...

  • पहाटे ४ वाजता घंटानाद

  • पहाटे ४.१५ वाजता काकड आरती

  • पहाटे ४.१५ ते ५.३० वाजता पवमान अभिषेक, पंचामृत पूजा आणि दुधारती

  • सकाळी ५ ते ९ वाजता श्रींच्या चलपादुकांवर भक्तांची महापूजा

  • सकाळी ६ ते १२ वाजता भाविकांना श्रींचे समाधी स्पर्श दर्शन, कीर्तन, वीणामंडप

  • दुपारी १२ ते १२.३० वाजता गाभारा स्वच्छता, समाधीवर पाणी घालणे आणि महानैवेद्य

  • दुपारी १२ वाजता भाविकांना समाधीचे दर्शन

  • सायंकाळी ५.४५ वाजता पालखीचे प्रस्थान

logo
marathi.freepressjournal.in