उद्धव ठाकरेंनी एक तरी काम दाखवावे; देवेंद्र फडणवीसांचे आव्हान

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या कांदिवली येथील निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन बुधवारी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर गोयल यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत बोलताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला.
उद्धव ठाकरेंनी एक तरी काम दाखवावे; देवेंद्र फडणवीसांचे आव्हान

प्रतिनिधी/मुंबई

मुंबई महापालिकेत सत्ता असताना उद्धव ठाकरे यांनी गेल्या पंचवीस वर्षांत मुंबईसाठी केलेले एक चांगले काम दाखवावे, असे आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या कांदिवली येथील निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन बुधवारी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर गोयल यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत बोलताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला.

“गेल्या १० वर्षांत मोदी सरकारने मुंबईतील सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवले. मुंबईमध्ये विविध विकासकार्यांचा धडाका लावत प्रत्येक वर्गातील माणसाचे जीवन सुकर करण्याचा विडा केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने उचलला आहे. यंदाची निवडणूक ही सामान्य माणसाच्या विकासासाठीची निवडणूक आहे. सामान्य माणसाच्या जीवनात कायापालट घडवून आणण्यासाठी मोदी सरकार गेल्या १० वर्षांपासून अथक कार्य करत आहे. यापुढे पाच वर्षे विकासाचे इंजिन वेगाने धावण्यासाठी देशाची सूत्रे मोदी सरकारच्याच हाती द्यायला हवी. महायुती म्हणजे सर्वसामान्य सर्वांना सामावून घेत सर्वांगीण विकास करणारी रेल्वे आहे. अशा रेल्वेमध्ये आपल्याला बसायचे आहे की, विरोधकांच्या वेगवेगळया दिशेने जाणाऱ्या इंजिनच्या रेल्वेत बसायचे आहे, हे सुज्ञ मतदारांनी ठरवायचे आहे,” असा टोलाही फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.

उत्तर मुंबईला उत्तम मुंबई बनवण्याचा संकल्प महायुतीच्या साथीने प्रामाणिकपणे पूर्ण करेन, असे पीयूष गोयल यांनी यावेळी सांगितले. “मोदी सरकारने सर्वसामान्य माणसाचे भविष्य उज्वल केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला विश्वशक्ती बनवण्यापासून कुणीही रोखू शकत नाही,” असेही गोयल म्हणाले. तर उत्तर मुंबईच्या प्रत्येक गल्लीत ‘मोदी है तो मुमकिन है’ चा गजर सुरू असल्याने विरोधकांचे धाबे दणाणल्यामुळेच ठाकरे गटाने येथून पळच काढल्याची टीका भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी यावेळी केली. गोयल हे पाच लाखांच्या विक्रमी मताधिक्याने विजयी होणार आणि मुंबईतील सर्वच्या सर्व सहा जागा महायुतीच जिंकणार असल्याचा विश्वासही शेलार यांनी व्यक्त केला.

यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, आमदार प्रवीण दरेकर, विजय गिरकर, योगेश सागर, अतुल भातखळकर, सुनील राणे, मनीषा चौधरी, प्रकाश सुर्वे, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष इंद्रपाल सिंह, आरपीआयचे उत्तर मुंबई अध्यक्ष रमेश गायकवाड आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in