

कोल्हापूर : कोल्हापूर शहराचा विकास करायचा असेल तर शहराची हद्दवाढ करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले.
येथे झालेल्या कार्यक्रमात फडणवीस म्हणाले की, आम्हाला कोल्हापूरकरांनी दिले आहे. त्यामुळे या सगळ्या नेत्यांना सांगतो, काही काळजी करू नका, यापूर्वीही कोल्हापूरमध्ये कधी कमी पडू दिलं नाही. यापुढेही कमी पडू देणार नाही, पण यात एक गोष्ट नक्की आहे हद्दवाढ करणं फार गरजेचं आहे. हद्दीबाहेरच्या लोकांच्या काही अडचणी आहेत, पण मी लोकप्रतिनिधींना सांगतो, १०० टक्के त्यांच्या अडचणी मी सोडवून देतो, असे आश्वासन त्यांनी दिले.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर तसेच कोल्हापूर मनपा महापौर रुपाराणी निकम यांनी कोल्हापूर हद्दवाढीचा मुद्दा उपस्थित केला होता.
आपल्याला कोल्हापूरला अधिक सुनियोजित करायचंय
फडणवीस म्हणाले, आज हायकोर्ट आलं, आता त्या हायकोर्टाला शेंडा पार्कला ७५ एकर जागा आपण देत आहोत. त्यामुळे शहरात रोज २० ते २५ हजार लोक येणार त्यामुळे या शहराला अधिक सुनियोजित आपल्याला करायचं आहे. आयटी पार्क, कन्व्हेन्शन सेंटर करत आहोत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण करत आहोत. त्यामुळे मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये शहराकरिता जो-जो विचार आपण सगळ्यांनी केला असेल, तो टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्ण याठिकाणी प्रयत्न करू, हा विश्वास मी आपल्याला देतो, असे ते म्हणाले.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर हद्दवाढीतविरोधात असलेल्या करवीरचे आमदार चंद्रदीप नरके आणि कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांचेही कान टोचले. दोघांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. कोल्हापूरच्या समस्या सोडवण्यासाठी कोल्हापूर मनपाकडून सविस्तर मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व्यासपीठावरून देण्यात आले.
फुटबॉलप्रेमींसाठी सुविधा देणार
कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी जागा उपलब्ध केली असून बीसीसीआयच्या माध्यमातून आधुनिक स्टेडियम उभारले जाईल. फुटबॉलप्रेमींसाठीही आवश्यक क्रीडा सुविधांवर भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
डी. वाय. पाटील यांचे कार्य दिलासादायक
शिक्षण, सहकार, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी उभे केलेले कार्य सामान्य माणसाला दिलासा देणारे होते. त्यांच्यासारख्या दूरदृष्टीच्या नेत्याचे निधन ही महाराष्ट्राची मोठी हानी असून, त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. फडणवीस यांनी कोल्हापुरातील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या ‘यशवंत’ निवासस्थानी भेट देऊन पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले.