

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांवर सध्या निरर्थक वाद सुरू असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. या देशात छत्रपती शिवरायांचा अवमान कुणीच करू शकत नाही. ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक १९७९ साली लिहिण्यात आले. त्यावर आज वाद उकरून काढायचा आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांना भिडायचे हे शुद्ध असामाजिक व असंवदेनशील कृत्य आहे, अशा शब्दात त्यांनी बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे अप्रत्यक्षपणे कान टोचले.
गायकवाड यांच्या घरावर मोर्चा...
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता? या पुस्तकावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकातील शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेखावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकी देत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली होती. त्यानंतर मंगळवारी आंबी यांनी बुलढाण्यात ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे वाचन करत संजय गायकवाड यांच्या घरावर डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांसोबत मोर्चा काढला. पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केले आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपरोक्त शब्दांत या घटनेविषयी आपला रोष व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री सोलापुरात पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, सध्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी निरर्थक वाद निर्माण झाला आहे. या देशात छत्रपती शिवरायांचा कुणीही अवमान करू शकत नाही. त्यांचा मान एवढा मोठा आहे की, कुणीही त्यांचा अशा पद्धतीने अपमान करणे शक्य नाही.