

नवी दिल्ली : ‘माझा पक्ष ठरवेल, माझे नेते ठरवतील, त्या दिवशी मी नक्की दिल्लीला जाईन. पण आज तरी माझे मत आहे मी २०२९ पर्यंत दिल्लीत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
खूप लोकांना व माझ्या काही हितचिंतकांना वाटते, मी जर दिल्लीला गेलो तर माझे प्रमोशन होईल. काही लोकांना असेही वाटते की हे दिल्लीला गेले तर बला टळेल, आपल्या डोक्यावर कोणी राहणार नाही, असे समजणारेही लोक आहेत, असा टोलाही त्यांनी हाणला.
एबीपी माझा या वाहिनीच्या एका कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर फडणवीस यांना तातडीने दिल्लीत बोलावून घेण्यात आले होते. अगदी अलीकडे केंद्रीय मंत्रिमंडळात बदल होण्याच्या बातम्या आल्या की, फडणवीस दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चा सुरू होतात. त्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस यांनी याबाबतच्या तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला.
महाराष्ट्र राज्य हे १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण करण्याच्या अगदी उंबरठ्यावर आहे. राज्याला १० टक्क्यांहून अधिक विकासदराचा टप्पा ओलांडायचा आहे, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. आज आपण ६६० बिलियनवर पोहोचलो आहोत. आपण शाश्वत विकास दर ठेवला, तर निश्चितपणे २०३० मध्ये आपण १ ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनवू, असे त्यांनी स्पष्ट केले.
मला माझा पक्ष कळतो
‘कोणाला चांगलं वाटो किंवा कोणाला वाईट वाटो, माझे नेते २०२९ पर्यंत मला महाराष्ट्रातच ठेवतील. मी तुम्हाला आजच सांगतो, माझे नेते मला महाराष्ट्रातच ठेवतील, मला राजकारण कळते, माझा पक्ष कळतो, त्यामुळे दर दोन ते तीन महिन्यांनी कधी कोणाला बातमी मिळाली नाही तर ते मला दिल्लीला पाठवतात, कधी कोणाला न्यूज क्रिएट करायची असेल तरी मला दिल्लीला पाठवतात, मला त्याचा आनंदच आहे.
सेकंड क्लासची भाडेवाढ नाही
२०२९ पर्यंत सर्व लोकल ट्रेन मेट्रोसारख्या होतील. वेळेवर धावणाऱ्या गाड्या आणि नवीन सिग्नलिंग सिस्टिमसहित सुसज्ज कोच मिळतील आणि हे सगळं केल्यानंतरही सेकंड क्लासचे भाडे वाढणार नाही. ‘एसी’ आम्ही देऊ, पण आम्ही भाडेवाढ करणार नाही, अशी मोठी घोषणा फडणवीस यांनी यावेळी केली.