

मुंबई : शहरांना विकासाचे केंद्र मानून त्यांच्या प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी अर्बन चॅलेंज फंडच्या माध्यमातून विकास करण्यात यावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केली. शहरांच्या सर्जनशील विकासासाठी या अभिनव अभियानामुळे नागरी पायाभूत सुविधा आणि सेवा वितरणात लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी ‘वर्षा’ निवासस्थानी नगर विकास विभागाच्या आढावा बैठकीत अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करताना महाराष्ट्राने या दृष्टीने पावले टाकली असून यापूर्वी नाशिक आणि पुणे महानगरपालिकेत या धर्तीवर निधी उभारणी करून पाणीपुरवठा आणि स्वच्छतेसाठी निधी उभारल्याची माहिती दिली.
९० हजार कोटींचा निधी प्रस्तावित
बैठकीत अर्बन चॅलेंज फंडासाठीच्या वित्तीय आकृतीबंधाबाबत चर्चा करण्यात आली. अभियानात ९० हजार कोटींचा प्रकल्प निधी प्रस्तावित आहे. महाराष्ट्रासाठी केंद्र आणि राज्य शासन मिळून एकूण ४४ हजार ८०० कोटींच्या प्रकल्पांना चालना मिळू शकते, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.