

अलिबाग : रायगड जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली असून माणगावच्या देवकुंड धबधब्यात दोन पर्यटक बुडाल्याची घटना घडली आहे. पुण्याहून १७ जणांचा ग्रुप फिरायला आला होता. धबधब्याखाली आनंद घेत असताना दोघे बुडून बेपत्ता झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकांना पाचारण केले आहे. दरम्यान, ही घटना नेमकी घडली कशी? याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, देवकुंड धबधब्यासह माणगावमधील वर्षा पर्यटन स्थळांवरनिर्बंध असताना देखील पर्यटकांची हुल्लडबाजी सुरु आहे. या परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात असतानाही पर्यटक धबधब्यावर पोहोचले कसे? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
नवापूरमध्ये नदीत बुडून दोन मुलांचा मृत्यू
नंदुरबार जिल्ह्यात नवापूरमध्ये नदीत बुडून दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आठवडा बाजार परिसरातील रंगवाली नदीच्या शेंड्या डुब येथे ही घटना घडली आहे. आंघोळीसाठी गेलेल्या तिघांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे, तर एकावर उपचार सुरू आहेत. या घटनेत दोन सख्ख्या भावांपैकी लहान भावाचा मृत्यू झाला आहे. नदी, तलाव व धोकादायक जलसाठ्यांमध्ये मुलांनी आंघोळ करू नये, पालकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.