
मुंबई : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी सातत्याने धनंजय मुंडे यांना टार्गेट केले जात आहे. महायुती तसेच विरोधी पक्षातील नेते आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हे प्रकरण लावून धरलेले असतानाच, आता दमानिया यांनी मुंडेंचे आणखी एक प्रकरण उकरून काढले आहे. मंत्रिमंडळात निर्णय झालाच नसताना मुंडे यांच्या सहीने खोटा अध्यादेश जारी करत २०० कोटींचा निधी वळवण्यात आला, असा आरोप दमानिया यांनी केला आहे. या आरोपांमुळे मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुंडे यांच्यावर तातडीने कारवाई करत त्यांना मंत्रिपदावरून हटवा, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. “कृषीमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी केलेले घोटाळे, संतोष देशमुख हत्येतील आरोपी वाल्मिक कराड व धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध हे पुराव्यासह समोर आणले आहे. त्यांनी कृषी संबंधित साहित्य खरेदी चढ्या दराने खरेदी केली. इफ्कोची प्रॉडक्ट्स २०० कोटींचा निधी मुंडे यांनी वळवला
वेबसाईटवर विकली जातात, हे समोर आणले. सगळ्या गोष्टी पुराव्यांसह मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिल्या आहेत. मात्र, मुंडेंवर कारवाईबाबत चालढकल सुरू आहे,” असा आरोप दमानिया यांनी केला.
“२३ सप्टेंबर आणि ३० सप्टेंबरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही निर्णय झाले. पण यात कृषी विभागाशी संबंधित न झालेल्या निर्णयांबाबत धनंजय मुंडेंनी आदेश काढला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत २०० कोटींच्या निधीचा कुठेही उल्लेख नसताना ती रक्कम आजच अदा करण्याचे निर्देश धनंजय मुंडे यांनी पत्रातून केले. याशिवाय ऑक्टोबरमध्ये अतिरिक्त ५०० कोटींचा निधी देण्याची मागणी केली. धनंजय मुंडेसारखा भ्रष्ट माणूस कृषी काय, कुठल्याच मंत्री पदावर बसण्यास पात्र नाही,” अशा शब्दात दमानिया यांनी मुंडेंवर टीकास्त्र सोडले.
मुंडेंनी केले आरोपांचे खंडन
धनंजय मुंडे यांनी मात्र या आरोपांचे खंडन केले आहे. “अंजली दमानिया यांनी बुधवारी पुन्हा एकदा अर्धवट ज्ञानाच्या आधारे खोटे बोलून जीआर काढला, असा आरोप केला. अंजली दमानिया यांनी गेल्या १५ वर्षात ज्या काही मीडिया ट्रायल रन केल्या, ज्या कोणाविरुद्ध आरोप केले त्यातील एकही आरोप अद्याप कोणत्याही न्यायालयात अथवा इतरत्र कोठेही सिद्ध होऊ शकलेला नाही. त्याचेही कारण अर्धवट माहिती हेच असावे. मंत्रिमंडळाचा निर्णय झाला किंवा नाही असे भासवून निर्णय होत नाही, भासवून गोष्टी करण्यासाठी ती अंजली दमानिया यांची प्रेस कॉन्फरन्स आहे का?,” असा प्रश्नही धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.