हायकमांडने युतीचे अधिकार तुम्हाला दिलेत का?प्रकाश आंबेडकर यांचा नाना पटोलेंना सवाल

राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाची चर्चा २५ जानेवारी रोजी होणार होती
पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल!  नाना पटोलेंच्या दाव्याने खळबळ

पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल!

नाना पटोलेंच्या दाव्याने खळबळ

प्रतिनिधी/मुंबई : लोकसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडीने दिलेल्या आमंत्रणावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे. असं वाटतंय की, तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेसोबत मनाचे खेळ खेळत आहात किंवा तुमच्या डोक्यात लोचा झाला आहे. काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रातील युतीसंदर्भात कोणतेही निर्णय घेण्याचे अधिकार तुम्हाला दिलेले नाहीत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व संभाषण राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबतच करतात आणि त्या चर्चांमध्ये तुम्हाला सहभागी केले जात नाही, कारण महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीच्या युतीसंदर्भात निर्णय घेण्याचे कोणतेही अधिकार तुम्हाला देण्यात आलेले नाहीत, असे पत्रच प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोले यांना लिहिले आहे. तिन्ही पक्षाच्या अध्यक्षांच्या सहीनेच वंचितला अधिकृत निमंत्रण द्या, असेही आंबेडकर यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे.

राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाची चर्चा २५ जानेवारी रोजी होणार होती. त्या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीलाही निमंत्रण देण्यात आले आहे. महाविकास आघाडीकडून याबाबत एक पत्रक जारी करण्यात आले असून त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या सह्या आहेत. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

 काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी २३ जानेवारी रोजी काँग्रेस भवन पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्टपणे म्हटले की, निवडणुका जाहीर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामील करण्यात येईल, जिथे तुम्ही बाजूलाच बसला होतात. तुमच्या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या इतर दोन जणांनी त्यांच्यासोबत झालेल्या बैठकांमध्ये अगदी स्पष्टपणे मला सांगितले आहे की काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रातील युतीसंदर्भात कोणतेही निर्णय घेण्याचे अधिकार तुम्हाला दिलेले नाहीत. शिवसेनेसोबत झालेल्या बैठकांमध्ये मला सांगण्यात आले आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व संभाषण राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबतच करतात आणि त्या चर्चांमध्ये तुम्हाला सहभागी केले जात नाही, कारण महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीच्या युतीसंदर्भात निर्णय घेण्याचे कोणतेही अधिकार तुम्हाला देण्यात आलेले नाहीत. काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रात युतीसंदर्भात निर्णय घेण्याची परवानगी तुम्हाला दिली आहे का? असा सवाल आंबेडकर यांनी नाना पटोले यांना पत्रात केला आहे.

तिन्ही पक्षांच्या अध्यक्षांच्या सहीचेच पत्र हवे

वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीकडून निमंत्रण द्यायचे असेल तर त्यावर तिन्ही घटक पक्षांच्या अध्यक्ष, म्हणजेच उद्धव ठाकरे, शरद पवार व मल्लिकार्जुन खर्गे यांची सही असायला हवी. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष, शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) व काँग्रेस यांच्या अध्यक्षांच्या सहीनिशी सन्मानपूर्वक निमंत्रण द्या किंवा रमेश चेन्नीथाला, राहुल गांधी, सोनिया गांधी अथवा मल्लिकार्जुन खर्गे यांपैकी कोणी वंचित बहुजन आघाडीला बैठकीसाठी बोलावल्यास कोणताही संकोच न ठेवता आम्ही त्यात सहभागी होऊ, असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in