
रायगड : बुधवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर दु:खाचा डोंगर कोसळला. मुसळधार पाऊस आणि त्यात दरड कोसळल्यानंतर तेथील नागरिकांची धावपळ उडाली.
‘‘आम्ही गाढ झोपेत असताना, अचानक मोठा आवाज आला. त्यावेळी आमच्या अंगावरही काही प्रमाणात मातीचा ढिग पडल्याचे आम्हाला जाणवले. आमची लेकरं ढिगाऱ्याखाली दबल्याचे लक्षात येताच आम्ही त्यांना माती उकरून बाहेर काढले आणि घरातून बाहेर पडत खालच्या दिशेने पळालो,” अशी आपबिती एका महिलेने सांगितली.
थरकाप उडवणारा प्रसंग सांगताना एका व्यक्तीला अश्रू अनावर होत नव्हते. ते म्हणाले की, “आमचे घर खचल्याने आम्हाला जाग आली, आम्ही बाहेर येऊन पाहतो तर आजूबाजूची सर्व घरे ढिगाऱ्याखाली दिसून आली, तर मोठी झाडे उन्मळून पडली होती. आम्ही सर्वजण झोपेत असताना हा प्रकार घडला. त्यामुळे कसे झाले हे आम्हाला काहीच कळले नाही. एक मोठा आवाज झाल्याने आम्हाला जाग आली, त्यावेळी आमच्यावर मातीचा ढिग होता. मग भाऊ आणि वहिनीने ढिगाऱ्याखाली दबलेल्या दोन्ही मुलांना माती उकरून बाहेर काढले आणि घरातून बाहेर पळालो. आमच्या बाजूची सर्व घरेही ढिगाऱ्याखाली दबली होती.”