साहित्यिकांनी ‘टुल किट’सारखे काम करावे; डॉ. भालचंद्र नेमाडे : जैन फाऊंडेशनच्या साहित्य पुरस्कारांचे वितरण 

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन तर्फे तिसरा द्विवार्षिक कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार नाटककार पद्मश्री सतीश आळेकर यांना प्रदान करण्यात आला.
साहित्यिकांनी ‘टुल किट’सारखे काम करावे; डॉ. भालचंद्र नेमाडे : जैन फाऊंडेशनच्या साहित्य पुरस्कारांचे वितरण 

जळगाव : साहित्यिकांनी नुसतेच लेखक म्हणून नव्हे तर त्यांनी नाविन्य शोधून समाजात ‘टुल किट’ सारखे काम करावे, मी जसा आहे तसाच व्यक्त व्हावे अनन्यसाधारण, युनिकपणा लेखकात असावा, अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केली.

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन तर्फे तिसरा द्विवार्षिक कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार नाटककार पद्मश्री सतीश आळेकर यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप दोन लाख रुपये, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि ग्रंथसंपदा असे आहे. श्रेष्ठ लेखिका म्हणून बहिणाई पुरस्कारासाठी श्रीमती सुमती लांडे, (श्रीरामपूर), श्रेष्ठ कवी म्हणून बालकवी ठोमरे पुरस्कारासाठी अशोक कोतवाल (जळगाव) तर श्रेष्ठ गद्यलेखक म्हणून ना. धों. महानोर पुरस्कारासाठी सीताराम सावंत यांना (इटकी, जि. सातारा) यांना समारंभ पूर्वक वितरण करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी एक लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि ग्रंथसंपदा असे आहे. सर्व पुरस्कार सुप्रसिद्ध साहित्यिक ज्ञानपीठ सन्मानित डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले.  याप्रसंगी व्यासपीठावर जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, बहिणाबाई चौधरी मेमोरीयल ट्रस्टच्या विश्वस्त सौ.ज्योती जैन, भवरलाल अॅण्ड कांताबाई फाऊंडेशनच्या विश्वस्त नीशा जैन व पुरस्कार प्राप्त मान्यवर उपस्थित होते. ‘‘मानवी जीवनाला कलंकीत करणाऱ्या विकृतींवर हल्लाबोल करण्याचे काम लेखक, कवी आणि विचारवंत करत असतात. अशा काळात कवितेची भूमिका महत्त्वाची ठरते. कवी हे भरकटलेल्या व्यवस्थेला फटकारे मारुन वठणीवर आणण्याचे काम करत असतात. आजूबाजुला घडणाऱ्या प्रसंगाचा विचार करताना असेच का? या प्रश्नाचा शोध कवी सतत शोधतो, चालताना तो कोलमडतो तेव्हा त्याला असे काही चांगले पुरस्कार, सन्मान हात धरुण उभे करत असतात. या पुरस्कारामुळे नवी उमेद येते व पुन्हा तो नव्या जोमाने चालू लागतो,’’ असे मत अशोक कोतवाल यांनी व्यक्त केले.

‘‘सध्या शहर व कॉक्रीटच्या जंगलामुळे उपजावू जमिनी कमी होत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे बिल्डर, विकासक आहेत. ते अशा पिकाऊ भूईला नष्ट करत असल्याने त्यांची विकासक नव्हे तर विध्वंसकाची भूमिका होय. ही बाब आपल्या ‘भुई भुई ठाव दे’ या कादंबरीमध्ये मांडले आहे. आज शब्दांच्या माध्यमातून सांकृतिक, वैचारिक प्रदूषण होत आहे.असे सांगून महात्मा गांधीजींसारख्या महान व्यक्तीमत्त्वाला शिक्षीत समाज गांधी वध म्हणत असतो,’’ ही खंत सीताराम सावंत यांनी व्यक्त केली.

बहिणाईंचे साहित्य दिशादर्शक

‘‘बहिणाईंचे साहित्य जगाला दिशादर्शक होते. त्यामुळे त्या मौलिक होत्या. त्यांच्या नावाने दिला जाणारा निर्मळ पुरस्कार आहे. पर्यावरणाशी दृष्टी असलेल्या वातावरणात निसर्गाच्या सान्निध्यातील कृतज्ञतापूर्वक सोहळ्यात हा पुस्कार दिल्याने आनंद आहे. पुरस्काराकडे पाहताना, व्यक्त होताना भरून येते. बहिणाबाईंच्या नावाने हा पुरस्कार मिळणे खूप मोलाचे असल्याचे सुमती लांडे सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या.

logo
marathi.freepressjournal.in