
मुंबई : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या व्यंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या गुंडांनी केलेली तोडफोड चिंताजनक व कायद्याच्या राज्यात शोभणारी नाही. कुणाल कामाला सत्ताधारी थेट धमक्या देत असताना महायुती सरकार झोपले आहे का? सत्ताधाऱ्यांना गुंडगिरी करण्याची मोकळीक दिली आहे का, असा सवाल करत सत्ताधारी पक्षाच्या गुंडांवर कडक कारवाई करण्याची धमक दाखवावी, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, एकनाथ शिंदे यांच्या गुंडांनी मांडलेला उच्छाद निंदनीय असून महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे का, असा प्रश्न पडला आहे. लोकशाहीत टीका स्वीकारायला शिकले पाहिजे, असे पंतप्रधान मोदी दोनच दिवसांपूर्वी म्हणाले आहेत. तुम्हाला टीका सहन झाली नाही तर लोकशाही मार्गाने त्यावर कारवाई करावी, मात्र ठोकशाही कशासाठी? भाजप व त्यांचे मित्र पक्ष विरोधकांवर खालच्या पातळीवर टीका करतात. त्यांची बदनामी करतात तेव्हा चालते का? शिंदेसेनेचे नेते कुणाल कामराला थेट धमक्या देत आहेत आणि त्याच्यावर हल्ला करण्याचे आवाहन करत आहेत, ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे.
गायकवाड म्हणाले की, तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. कार्यक्रमस्थळी आणि कलाकाराला सुरक्षेची हमी द्यावी. शांततेत आंदोलन करण्याचा हक्क सगळ्यांना आहे. मात्र हिंसा आणि धमक्यांचा हक्क कोणालाच नाही. कायदा हा सर्वोच्च स्थानी राहिलाच पाहिजे, असेही गायकवाड म्हणाल्या.
गायकवाड यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्यासारख्यांनी अपमान तेव्हा या सरकारकडून कोणताही संताप व्यक्त करण्यात आला नाही. मात्र एका विनोदी कार्यक्रमावरून मात्र हे सरकार हादरले आहे. जेव्हा सत्ताधारीच कायद्याचा आदर करत नाहीत तेव्हा सामान्य माणसाने कायद्यावर विश्वास ठेवायचा तरी कसा? हल्ला करण्यात आलेली हॅबिटॅट ही जागा एक सांस्कृतिक जागा नव्हेच तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रतीक आहे आणि आज तेच भयाच्या छायेखाली आहे, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.