"त्याला काय करायचं ते कर, मराठ्यांना आरक्षण ओबीसींमधूनच घेणार!", जरांगे-पाटलांनी जालन्यातून शड्डू ठोकला

24 डिसेंबरपर्यंत शांततेत आंदोलन करा, असं आवाहन जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाला केलं आहे.
"त्याला काय करायचं ते कर, मराठ्यांना आरक्षण ओबीसींमधूनच घेणार!", जरांगे-पाटलांनी जालन्यातून शड्डू ठोकला

राज्य सरकारने कुणा एकट्याच्या दबावाखाली येऊन जर मराठ्यांशी दगाफटका केला तर सुट्टी देणार नाही, असं थेट आव्हान मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला दिलं आहे. आम्ही गेल्या ७० वर्षापासून कष्ट करतोय आणि त्यांच्यावर अन्या केला जातोय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना शेवटचं सांगतोय, मराठ्यांना आरक्षण द्या, अन्यथा परिणामांना सामोरं जा, अशा इशारा जरांगे यांनी दिला आहे. मराठ्यांना आरक्षण देणार आणि तेही ओबीसीमधूनच घेणार, त्याला काय करायचं ते कर असं चँलेंज देखील छगन भुजबळ यांना दिलं आहे. ते जालना येथील सभेत बोलत होते.

यावेळी जरांगे यांनी जालना येथील झालेल्या लाठीचार्जवर देखील भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, आम्ही शांततेत आंदोलन करत असताना आमच्या आया बहिणींवर हल्ला झाला, त्यांचं रक्त सांडलं. इतकं निष्ठूर सरकार आम्ही पाहिलं नाही. एकीकडे म्हणता आमच्यावरील गुन्हे मागे घेणार, दुसरीकडे आमच्या लोकांना अटक करता. तीन महिन्यांनतर आमच्या लोकांना अटक केली. लातूरमध्ये असं काय झालं की त्याठिकाणी संचारबंदी केली, असं म्हणत त्यांनी आम्ही लातूरला कार्यक्रम घेणारचं. आमच्या लोकांवर अन्याय केला तर पुढच्या काळात आम्ही सहन करणार नाही. एका व्यक्तीच्या दबावामुळे हे सगळ होत असेल तर सहन करणार नाही, असं जरांगे म्हणाले.

यावेळी बोलताना जरांगे यांनी कार्यकर्त्यांच्या अटकेवर भाष्य केलं. अंतरवालीतील गुन्हे दोन दिवसात आणि महाराष्ट्रातील गुन्हे एका महिन्यात मागे घेणार होते. उदय सामंत, धनंजय मुंडे साहेब संदीपान भूमरे साहेब, अतुल सावे साहेब यांनी सांगितलं आपले गुन्हे मागे घेण्यात येतील, एकालाही अटक होणार नाही, असं सांगितलं होतं. मग कार्यकर्त्यांना का अटक केली? असा प्रश्न त्यांनी सरकारला केला आहे.

24 डिसेंबरपर्यंत शांततेत आंदोलन करा, मराठा शांत आहे. असं आवाहन देखील त्यांनी मराठा समाजाला केलं. मराठ्यांना २४ तारखेला सरसकट आरक्षण मिळणार आहे. तसं झालं तर काय करायचं ते पाहू असा इशारा त्यांनी सरकारला दिला.

logo
marathi.freepressjournal.in