मुंबई : शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पुरवठा वेळेत झाला नाही तर अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल शेतकरी उचलतात. त्यामुळे ‘सिबिल’साठी शेतकऱ्यांना सतावू नका. रिझर्व्ह बँकेनेसुद्धा कृषी कर्जाबाबत स्पष्टता केली आहे. त्यामुळे जर कोणती बँक शाखा ‘सिबिल’साठी शेतकऱ्यांना सतावत असेल तर कठोर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना दिला आहे. तसेच कृषी कर्ज पुरवठ्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी विशेष प्रयत्न करून यंदाच्या वर्षी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे, अशा सूचना फडणवीस यांनी केल्या.
४४ लाख ७६ हजार कोटींच्या पतपुरवठा आराखड्यास मंजुरी
‘राज्यस्तरीय बँकर्स समिती’ची १६७ वी बैठक सह्याद्री अतिथीगृहात झाली. यावेळी राज्याचा सन २०२५-२६ या वित्तीय वर्षाचा ४४ लाख ७६ हजार ८०४ कोटी रुपयांचा पतपुरवठा आराखडाही बैठकीत मंजूर करण्यात आला.
शेतकरी हा राज्याचा कणा असून कृषी व्यवसाय हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. या भागाकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांनी कृषी कर्ज पुरवठा वाढवण्यावर भर द्यावा. हवामान विभागाने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती नाही, पीक चांगले येणार आहे. अशात बँकांनी शेतकऱ्यांना अधिक सहकार्य करायला हवे. चांगला पाऊस झाला की कृषी विकासदर चांगला असतो. याचा लाभ बँकांनीही घ्यावा आणि शेतकऱ्यांनाही द्यावा. कृषी क्षेत्रामध्ये सध्या गुंतवणूक धोरण राबवण्यात येत आहे. त्यामध्ये बँकांची भूमिका महत्त्वाची असून त्यांनी या गुंतवणुकीमध्ये सहभागी व्हावे. कृषी क्षेत्रामध्ये किमान ५ हजार कोटी प्रतिवर्षी गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये आता गुंतवणुकीला नवीन संधी उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे बँकांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पतपुरवठा करावा. त्याचा बँकांना फायदाच होणार आहे, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.
महाराष्ट्राने अर्धा ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा टप्पा पार केला असून एक ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्याकडे वेगाने वाटचाल सुरू आहे. एक ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्यामध्ये बँकांची भूमिका महत्त्वाची आहे. थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. दावोसमधून राज्यात १६ लाख कोटींची थेट गुंतवणूक आली आहे. महाराष्ट्र आता स्टार्टअप्सची राजधानी आहे. या क्षेत्राकडेही बँकांनी लक्ष द्यावे. त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे. ‘एसएसएमई’मध्ये राज्य प्रथम क्रमांकावर असून त्यामध्ये गुंतवणुकीस चांगल्या संधी आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.
महिला उद्योजकांना सहकार्य करावे - शिंदे
कृषी कर्ज पुरवठ्याचा विषय बँकांनी गांभीर्याने घ्यावा. तसेच कर्ज पुरवठ्याचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करावे. उद्योजकांना विशेषतः महिला उद्योजकांना बँकांनी सहकार्य करावे. महामुंबई क्षेत्रातही कर्ज पुरवठा वाढवण्यावर भर द्यावा. या क्षेत्रात विकासाच्या मोठ्या संधी असल्याचेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.