
नागपूर : मी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा सच्चा कार्यकर्ता आहे. ज्यांनी मला कमी समजण्याची चूक केली, त्यांचा टांगा मी २०२२ मध्येच पलटी केला. सरकार बदलले आणि जनतेच्या मनातील डबल इंजिन सरकार महाराष्ट्रात आणले. त्यामुळे मला अजूनही कमी समजू नका, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
नागपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख (उबाठा) उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी मी स्पष्टपणे सांगितले होते. मी आणि देवेंद्र फडणवीस २०० पेक्षा जास्त विधानसभेच्या जागा निवडून आणू. प्रत्यक्षात २३२ जागा निवडून आणल्या आहेत. त्यामुळे मला कमी समजू नये. ज्यांना हा संकेत समजून घ्यायचा आहे त्यांनी समजून घ्यावा, असाही टोलाही शिंदे यांनी लगावला.
मला महादजी शिंदे पुरस्कार ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते देण्यात प्रदान करण्यात आला. एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी व्यक्तीला पुरस्कार देतो. महादजी शिंदेंसारख्या पराक्रमी महापुरुषाच्या नावाने पुरस्कार दिला जातो, ही मोठी गोष्ट आहे. त्यावरही टीका करणे म्हणजे त्यासंदर्भात हे लोक किती जळतात हे दिसते, एक दिवस ते जळून खाक होणार, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.
कितीही शिव्या द्या, जनता आमच्या सोबत!
या लोकांनी साहित्यिकांना दलाल म्हणून त्यांचा अपमान केला. महादजी शिंदे यांच्या वंशजांचाही अपमान केला. कधी तरी स्वत:मध्ये सुधारणा करा. माझ्यावर कितीही आरोप करा, शिव्या द्या, जोवर जनता आमच्या सोबत आहे, तोवर काहीच होणार नाही, असेही शिंदे यांनी अप्रत्यक्षरीत्या उद्धव ठाकरे गटाला सुनावले.