भविष्यात जमणारच नाही अशी भूमिका घेऊ नका; उद्धव ठाकरेंचे प्रकाश आंबेडकरांना आवाहन

भविष्यात शिंदेंच्या शिवसेनेतील कोणालाही आपल्या पक्षात घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राजू शेट्टी हे मशाल चिन्हावर लढण्यास तयार नव्हते, म्हणून आम्हाला हातकणंगलेत उमेदवार द्यावा लागला, असेही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.
भविष्यात जमणारच नाही अशी भूमिका घेऊ नका; उद्धव ठाकरेंचे प्रकाश आंबेडकरांना आवाहन

प्रतिनिधी/मुंबई

आमच्या दोघांच्याही आजोबांचे ऋणानुबंध होते. आम्ही हुकूमशाहीविरोधात एकत्र आलो होतो. आज आपले जमले नसेल, पण भविष्यात जमणारच नाही अशी भूमिका घेऊ नका. काही वेळा काही गोष्टी होत नाहीत, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना केले. प्रकाश आंबेडकरांची वंचित महाविकास आघाडीसोबत युती होऊ शकलेली नाही. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी प्रथमच आपली प्रतिक्रिया दिली आहे. भविष्यात शिंदेंच्या शिवसेनेतील कोणालाही आपल्या पक्षात घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राजू शेट्टी हे मशाल चिन्हावर लढण्यास तयार नव्हते, म्हणून आम्हाला हातकणंगलेत उमेदवार द्यावा लागला, असेही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.

आंबेडकर यांच्या वंचितचे आणि महाविकास आघाडीचे फिस्कटले आहे. काही ठिकाणी वंचितने काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. बारामतीमध्येही सुप्रिया सुळेंना पाठिंबा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी प्रथमच प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “आज आपलं जमलं नसेल. पण प्रकाशजी भविष्यात आपलं जमणारच नाही, अशी भूमिका घेऊ नका,” असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. “आंबेडकर यांच्याबद्दल काही बोलणार नाही. आपण हुकूमशाहीविरुद्ध एकत्र आलो होतो. काही वेळा काही गोष्टी होत नाहीत,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

प्रकाश आंबेडकर आज अर्ज दाखल करणार

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत गुरुवारी संपणार आहे. त्यामुळे या आठही मतदारसंघात अर्ज भरण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांची लगबग दिसून येणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर गुरुवारी सकाळी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी लोकसभा मतदारसंघासाठी येत्या २६ एप्रिलला मतदान होत आहे. या आठही मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ४ एप्रिलला दुपारी तीन वाजता संपत आहे. त्यामुळे गुरुवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची लगबग असणार आहे. दरम्यान, बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या प्रतापराव जाधव, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड, माजी आमदार विजयराज शिंदे यांनीही बुलढाण्यातून अर्ज भरला आहे. अकोल्यात भाजपच्या अनुप धोत्रे, वर्धामधून भाजपच्या रामदास तडस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अमर काळे, यवतमाळ-वाशिममधून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या संजय देशमुख, हिंगोलीतून ठाकरे गटाचे नागेश पाटील अष्टीकर तर परभणीमधून महादेव जानकर यांनी आपापले अर्ज दाखल केले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in