मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने दिलेले आरक्षण घेत उपोषण मागे घ्यावे व ओबीसी समाजाच्या आक्रमकपणाची वाट पाहू नये, असा इशारा ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
सरकार व मनोज जरांगे पाटील यांच्यामधे आरक्षण तज्ज्ञ व अभ्यासक शांत बसले आहेत, कारण त्यांचे कोणीच ऐकत नाही. तरीही सरकारने टिकणारे आरक्षण दिले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात सरकारची ही भूमिका अभ्यासपूर्ण आहे. गेल्यावेळी सरकार न्यायालयात बाजू मांडण्यास कमी पडले होते. आता सरकारने मागील अनुभवावरून व मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर योग्य तो निर्णय घेतला आहे, असे शेंडगे यांनी सांगितले.
सगेसोयरे व गणगोत या मनोज जरांगे पाटील यांच्या मुद्यावर सरकारने आता कोणतीही भूमिका घेऊ नये. घेतली तर सर्व मागासवर्ग सगेसोयरे व नातेवाईक यांच्या पूर्वीच्या सर्व नोंदीचा मुद्दा समोर येईल. त्यामुळे सरकारने मराठा कुणबीकरण दाखले वाटप करणे थांबवावे अशी मागणी शेंडगे यांनी यावेळी केली.
सर्वेक्षणासाठी ३६० कोटी खर्च केले तसेच ५०० कोटी करत जनगणना कार्यक्रम राबवावा. तरच आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल. नाहीतर राज्यभरातील कुणबी समाज आक्रमक होत मोठे आंदोलन पेटेल व त्यावेळी कायदा सुव्यवस्था धोक्यात येईल, अशी भीती शेंडगे यांनी यावेळी व्यक्त केली.