
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिले त्यामुळे आम्ही आयुष्यभर त्यांचे गुलाम राहू. मी मंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेणार होतो पण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेईन. 17 तारखेला मी मुख्यमंत्र्यांना भेटेन आणि त्यानंतर 18 तारखेला माझा निर्णय जाहीर करेन, असे प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू (Bacchu kadu) यांनी सांगितले. अमरावती येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली वेगाने सुरू आहेत. बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळाचा लवकरात लवकर विस्तार करण्याची मागणी वेळोवेळी केली होती. अजित पवारांच्या गटाने सत्ता पक्षामध्ये एंट्री घेतली आणि राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र त्यामुळे आधीच मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतिक्षेत असलेल्या आमदारांमध्ये अस्वस्थता वाढली होती. मात्र बदलत्या राजकारणाला कंटाळून मंत्रिपदाचा दावा सोडणार असल्याचे बच्चू यांनी कडवटपणे सांगितले होते. आजच्या पत्रकार परिषदेत ते याबाबत घोषणा करणार होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या अनेक विनंतीमुळे हा निर्णय सध्या मागे घेत असल्याचे बच्चू यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी आग्रही विनंती केल्याने मी सध्या निर्णय मागे घेत आहे. काम, पद, हे येतच राहतील. पण विश्वास गेला तर परत कधीच येत नाही.