राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक घोषित; राज्यातील ६ जागांचा समावेश बदलत्या राजकीय समीकरणामुळे रंगत

राज्यसभा निवडणुकीसाठी होणारे मतदान हे खुले मतदान असल्याने पक्षादेश म्हणजे व्हीप महत्त्वाचा ठरणार आहे.
राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक घोषित; राज्यातील ६ जागांचा समावेश बदलत्या राजकीय समीकरणामुळे रंगत

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने सोमवारी १६ राज्यांतील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ५६ जागांसाठी निवडणूक जाहीर केली. यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश असून त्यासाठी २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी होणारे मतदान हे खुले मतदान असल्याने पक्षादेश म्हणजे व्हीप महत्त्वाचा ठरणार आहे. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. राज्यात बदललेल्या राजकीय पार्श्वभूमीवर या निवडणुकीसाठी मतदान झाल्यास बरीच रंगत येणार आहे. दरम्यान, शिवसेना उद्धव ठाकरे गटाला भरत गोगावलेंचा व्हीप मानावा लागणार असल्याने ठाकरे गटाची कोंडी होणार आहे. जुलै २०२२ मध्ये झालेल्या राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीत भाजपने आघाडीची मते फोडून चौथा उमेदवार विजयी केला होता. या निवडणुकीत आघाडीच्या फुटीची बीजे पेरली गेली होती. त्यानंतरच्या विधान परिषद निवडणुकीत आघाडीचा पराभव निश्चित करून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. या बंडानंतर आघाडी सरकारला आणि मुख्यमंत्रीपदावरून उद्धव ठाकरेंना पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर निवडणूक अयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निर्णय दिला. त्यामुळे या निवडणुकीत शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावलेंचा पक्षादेश शिवसेना आमदारांना लागू होणार आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. या फुटीनंतर दोन्ही गटाची निवडणूक आयोग आणि विधिमंडळात लढाई सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत निवडणूक आयोगाने अजून निर्णय दिलेला नाही. राष्ट्रवादी आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणी सुरू आहे. राज्यसभा निवडणुकीआधी निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांकडून राष्ट्रवादीच्या संदर्भात निर्णय अपेक्षित आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यसभेची निवडणूक रंगतदार ठरणार आहे. भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त असल्याने राज्यसभा निवडणुकीसाठी विधानसभेतील २८७ आमदार मतदान करतील. या निवडणुकीत विजयासाठी ४२ मतांचा कोटा आवश्यक आहे. जुलैमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने मतांचे गणित जमवून मतदान केले होते. त्यामुळे विजयी उमेदवाराच्या अतिरिक्त मतांवर भाजपने चौथा उमेदवार निवडून आणला होता. मात्र, आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे १५ ते १६ आमदार, तर शरद पवारांकडे ११ आमदार आहेत. त्यामुळे या दोन्ही गटांना राज्यसभा निवडणुकीत विजयाचे गणित जमविणे अवघड आहे. अशातच उद्धव ठाकरे गटाला शिंदे गटाचा व्हीप लागू होणार असल्याने ठाकरे गटाची कोंडी होणार आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी ८ फेब्रुवारी २०२४ रोजी अधिसूचना जारी होणार आहे. १५ फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज करण्याची अंतिम तारीख असून १६ फेब्रुवारीला उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल. या निवडणुकीत २० फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील, तर २७ फेब्रुवारीला सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार असून सायंकाळी पाच वाजता मतमोजणी होऊन निकाल घोषित केले जातील. निवडणूक आयोगाने या निवडणुकीत मतदानासाठी विशेषत: जांभळ्या रंगाचे स्केच पेन वापरण्याचे निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय बलाबल

भाजप : १०४, राष्ट्रवादी (अजित पवार गट) : ४२. शिवसेना (एकनाथ शिंदे गट): ४०, काँग्रेस : ४५, शिवसेना उद्धव ठाकरे गट : १६ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : ११, बहुजन विकास आघाडी : ३, समाजवादी पक्ष, एआयएम आणि प्रहार जनशक्ती प्रत्येकी २, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सीपीआयएम, शेकाप, स्वाभिमानी पक्ष, रासप, जनसुराज्य शक्ती, क्रांतिकारी शेतकरी पक्ष प्रत्येकी १ आणि अपक्ष १३... एकूण २८७

२ एप्रिल २०२४ रोजी मुदत संपणारे राज्यसभा सदस्य

भाजप

प्रकाश जावडेकर, व्ही.मुरलीधरन,

नारायण राणे

शिवसेना ठाकरे गट

अनिल देसाई

राष्ट्रीय काँग्रेस

कुमार केतकर

राष्ट्रवादी शरद पवार गट

वंदना चव्हाण

logo
marathi.freepressjournal.in