अभियांत्रिकीच्या दुसऱ्या यादीत केवळ १८ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश; पहिल्या फेरीच्या तुलनेत प्रवेशात घट

अभियांत्रिकी अभ्यासकांच्या पहिल्या यादीप्रमाणेच दुसऱ्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांनीही प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे. पहिल्या यादीत प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ २२ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. यानंतर जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीतील केवळ १८ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यामुळे विद्यार्थी तिसऱ्या गुणवत्ता यादीत प्रवेश घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : अभियांत्रिकी अभ्यासकांच्या पहिल्या यादीप्रमाणेच दुसऱ्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांनीही प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे. पहिल्या यादीत प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ २२ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. यानंतर जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीतील केवळ १८ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यामुळे विद्यार्थी तिसऱ्या गुणवत्ता यादीत प्रवेश घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अभियांत्रिकी अभ्यासकांच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये १ लाख ८३ हजार ७६० जागांसाठी १ लाख ८९ हजार २७७ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचा पसंतीक्रम भरला होता. त्यातील १ लाख ६२ हजार २०५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. यातील केवळ १४ हजार १६ विद्यार्थ्यांना पहिल्या तीन क्रमांकाचे पसंतीचे महाविद्यालय मिळाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे प्रवेश आपोआप निश्चित झाले. मात्र दुसऱ्या फेरीमध्ये अवघ्या २९ हजार ९१० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले.

प्रथम तीन पसंतीच्या महाविद्यालयांव्यतिरिक्त इतर महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे दुसऱ्या यादीत प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ १८ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. अभियांत्रिकीच्या पहिल्या फेरीमध्ये ३४ हजार ९३१, तर दुसऱ्या फेरीमध्ये २९ हजार ९१० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने दोन्ही फेऱ्यांमध्ये मिळून ६४ हजार ८४१ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले आहेत.

नियम बदलाचा परिणाम नाही

अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक होते. मात्र उर्वरित विद्यार्थ्यांना ‘उत्तम महाविद्यालय’ हा पर्याय उपलब्ध असल्याने दरवर्षी अखेरच्या फेरीपर्यंत विद्यार्थी प्रवेश घेत नव्हते. त्यामुळे शैक्षणिक वर्ष विलंबाने सुरू होत असे. त्यामुळे तंत्रशिक्षण विभागाने यंदा प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल करत पहिल्या फेरीमध्ये पहिल्या पसंतीचे महाविद्यालय, दुसऱ्या फेरीमध्ये पहिल्या तीन पसंतीचे महाविद्यालय मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक केले आहे. यानंतरही या बदलाचा फारसा परिणाम झाल्याचे दिसून येत नाही.

logo
marathi.freepressjournal.in