सरकारने गोळ्या घातल्या तरी आता माघार नाही ;मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

जरांगे पाटील बीडच्या सभेत पुढील वर्षी २० जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता.
सरकारने गोळ्या घातल्या तरी आता माघार नाही ;मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
Hp

छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्राच्या मागणीसह टिकणारे आरक्षण द्यावे, या मागणीवर ठाम असलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला बुधवारी पुन्हा एकदा इशारा दिला. आता सरकारने गोळ्या घातल्या तरी चालतील परंतु मुंबईतील आंदोलनातून माघार घेणार नाही, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका जाहीर केली.

जरांगे पाटील बीडच्या सभेत पुढील वर्षी २० जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला शांततेचे आवाहन केले होते. तर घाई गडबडीत मराठा समाजाला टिकणार आरक्षण मिळणार नसल्याचेही सरकारने जाहीर केले होते. असे असतानाच आता मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, “मुंबईतील आंदोलनाची सविस्तर माहिती गुरुवारी देणार आहोत. टिकणाऱ्या आरक्षणबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी. सरकारने गोळ्या घातल्या तरी चालतील परंतु आता माघार नाही,” असे म्हणत मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे.

बीडच्या सभेतच त्यांनी मराठा समाजाला पुन्हा एकदा आवाहन केले. “महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या, भविष्यात मुलांचे हाल होणार आहेत, त्यामुळे सगळ्यांनी घर सोडा. सरकार त्यांचे काम करत आहे, आम्ही आमचे काम करत आहोत. मराठा आणि कुणबी एकच आहेत, तेव्हा आता घराबाहेर पडा, मुंबईकडे चला,” असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केलं आहे.

मराठे मुग्यांसारखे घराबाहेर निघतील

सरकार आरक्षण देत नाही म्हणून त्यामुळे आम्ही मुंबईकडे जाणार आहोत. सरकारने ५० टक्क्यांच्या वर दिले तर ते टिकणारे आरक्षण असेल का? मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी आमचा लढा आहे. गरीब धनगरांना न्याय देण्यासाठी प्रकाश शेंडगेंनी शक्ती वापरावी, मुंबईला जाण्यााठी मराठे मुग्यांसारखे घराबाहेर निघतील, सरकारकडून कुणावरही गुन्हे दाखल करण्याचे काम केले जात आहे. तरअयोध्येचा सोहळा आनंदाचा, मीदेखील हिंदूच आहे. राम मंदिराचे उद्घाटन पाहून मुंबईतील आंदोलन ठरवले जाईल, असेही मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in