
सत्ताधारी विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ईडीचा वापर करत असल्याचा आरोप वारंवार केला जातो. आज राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. औरंगजेब मेला असता तरी आजही तो ईडीच्या रुपाने जिवंत असल्याचे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना येत असलेल्या ईडीच्या नोटीस आणि होत असलेल्या चौकशीवर आपली खदखद व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते सांगलीच्या वाळवा तालुक्यातील बागणी ग्राम पंचायत इमारतीवर उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या तैलचित्राच्या अनावरण सोहळ्यात आमदार अमोल मिटकरी बोलत होते. यावेळी जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना मिटकरी यांनी ईडीवर सडकून टीका केली. औरंगजेबाची कितीही आक्रमणे आली तरीही छत्रपती संभाजी महाराज डगमगले नाहीत. इंग्रजांची, डचांची, मोघलांची, पोर्तूगालांची आक्रमणे झाली, तहीही महाराज डगमगले नाहीत. हेच रक्त तुमच्या आमच्यात आहे, असे मिटकरी यावेळी म्हणाले. तसेच औरंगजेब मेला असला तरी देखील ईडीच्या रुपाने तो जिवंत आहे. त्यामुळे ईडीची कितीही आक्रमणे झाली तरी त्याला शरण न जाणारा योद्धा म्हणून खासदार शरद पवार आणि आमदार जयंत पाटील यांच्याकडे आम्ही पाहतो, असे ते म्हणाले. शरण जाणारे काही दिवसांनी शपथ घेतील. पण शरण न गेलेल्यांना काही दिवस त्रास होत राहतो, असे देखील अमोल मिटीकरी यांनी म्हटले आहे.