
नांदेड : मतमोजणी प्रक्रियेदरम्यान भारत निवडणूक आयोगाच्या सूचनाप्रमाणे प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील पाच केंद्राच्या ईव्हीएम मशीनवरील उमेदवारनिहाय प्राप्त मतांची आकडेवारी ही व्हीव्हीपॅटशी जुळते का, याची तपासणी केली जाते. केंद्राची निवड ही लॉटरी पद्धतीने होत असते. जिल्ह्यातील लोकसभेच्या ३० व विधानसभेच्या ४५अशा एकूण ७५ केंद्राची मतमोजणी बिनचूक असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.
केंद्राची निवड सर्व लॉटरी पद्धतीनुसार उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या समक्ष चिठ्ठी काढून केली जाते. तर मोजणीची प्रक्रिया निवडणूक निरीक्षकांच्या पुढे केली जाते. हे निवडणूक निरीक्षक वेगवेगळ्या राज्यातील वरिष्ठ सनदी अधिकारी असतात. प्रत्येक वेळी निवडणूक संपल्यानंतर ही प्रक्रिया पार पाडली जाते. नांदेडमध्ये देखील ही प्रक्रिया पार पाडली गेली आहे.या प्रक्रियेमागील उद्देश हा सर्व ठिकाणच्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅटमधील उमेदवारनिहाय प्राप्त मतदानाची आकडेवारी अचूक असल्याची खात्री पटविण्यासाठी खातरजमा प्रक्रिया म्हणून केली जाते.
मतमोजणी दरम्यान प्रत्येक विधानसभा मतदारसंघ क्षेत्रनिहाय ५ व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या प्रत्यक्ष मोजल्या जातात. त्यांची ईव्हीएममधील मतांसोबत पडताळणी केली जाते. या ५ केंद्रांची निवड लॉटरी पद्धतीने सर्व उमेदवार, मतमोजणी प्रतिनिधी यांच्या समक्ष चिठ्ठी काढून होते. ही प्रक्रिया निवडणूक निरीक्षक यांच्या समोर होते. त्यानंतर व्हीव्हीपॅट चिठ्ठी मतमोजणी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत मोजल्या जातात. सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी ५ प्रमाणे ४५ मतदान केंद्रांची व्हीव्हीपॅट पडताळणी करण्यात आली असून, सर्व ४५ ठिकाणी व्हीव्हीपॅट व ईव्हीएम कंट्रोल युनिट यातील उमेदवार निहाय मतांची आकडेवारी पूर्णतःजुळली आहे.
दोन्ही मतदान केंद्राची आकडेवारी पूर्णतः जुळली
लोकसभा पोट निवडणुकीसाठी लोकसभेतील ६ विधानसभा क्षेत्रातील प्रत्येकी ५ प्रमाणे ३० मतदान केंद्रांसाठी व्हीव्हीपॅट पडताळणी करण्यात आली असून सर्व ३० ठिकाणी व्हीव्हीपॅट व ईव्हीएम कंट्रोल युनिट यातील उमेदवारनिहाय मतांची आकडेवारी पूर्णतः जुळली आहे.