जळगावमधील राजमल रखीचंद ज्वेलर्सच्या कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे. ईडीच्या रडारवर आता आर. एल गृप आल्याचं दिसून येत आहे. ईडीकडून मागील काही तासांपासून आर. एल गृपची चौकशी सुरु असल्याचं वृत्त टिव्ही-९ या वृत्तवाहिनीने दिलं आहे. वेगवेगळ्या सहा ठिकाणी ईडीने हा छापा टाकल्याचं सांगण्यात येत आहे. तर ईडीच्या ६० अधिकाऱ्यांच्या पथकाने ही छापेमारी केली आहे. ईडीच्या हातात काही महत्वपूर्ण दस्तावेज लागल्याची देखील माहिती समोर आली आहे. तसंच लॉक असलेली एक लोखंडी पेटी देखील ईडीने ताब्यात घेतली असल्याचं सांगितलं जातंय.
राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वरलाल जैन आणि माजी आमदार मनिष जैन यांच्या मालकीच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या विविध कार्यालयांवर ही छापेमारी करण्यात आली आहे. जळगाव, नाशिक आणि ठाण्यातील कार्यालयाचा यात समावेश आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील ईडीच्या दहा गाड्या जळगावत दाखल झाल्याचं सांगितलं जात आहे. स्टेट बँकेकडून घेतलेल्या थकीत कर्जाबाबत देखील चौकशी करण्यात येत आहे. सकाळी सात वाजेपासून ईडीच्या गाड्या जळगावात दाखल झाल्या आहेत.
जळगाव आणि नाशिकमधील राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या सहा फर्मवर ईडीच्या ६० अधिकाऱ्यांच्या टीमने एकसाच वेळी धाड टाकून ही कारवाई केली आहे. नाशिक आणि ठाण्यातील कार्यालयांवर देखील ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे सुर्वणनगरी म्हणून ओळख असणाऱ्या जळगावच्या सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.