शासकीय योजनांची गतिमान अंमलबजावणी करण्यासाठी सुरू केलेल्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानाला ३० ऑगस्टपर्यंत राज्य सरकारने मुदतवाढ दिली आहे. याबाबतचा जीआर नियोजन विभागाने जारी केला आहे.
राज्यातील जनता, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांचा राज्य सरकारच्या विविध विभागांशी विविध कारणांमुळे संबंध येत असतो. त्यांचे प्रश्न निकाली काढणे तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाची सातारा जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सुरुवात झाली. हे अभियान १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत राबवण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले होते. या अभियानाला मुदतवाढ देण्यात आली असून, ते आता ३० ऑगस्टपर्यंत राबवले जाणार आहे. शासकीय योजनांशी निगडीत कार्यालयांतील सरकारी अधिकारी-कर्मचारी हे एका छताखाली राज्यातील जनतेला विविध योजनांचे लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.