
वर्धा : युती शक्य नसेल तिथे मैत्रीपूर्ण लढत होईल. आपण ही निवडणूक महायुती म्हणून लढणार, पण युतीचा निर्णय स्थानिक नेत्यांनी घ्यायचा आहे. मित्र पक्षावर टीका करायची नाही. शक्यतो सर्वच ठिकाणी महायुती म्हणूनच आपण निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपची विदर्भ विभागीय बैठक सेवाग्राम मार्गावरील चरखागृह येथे सोमवारी पार पडली. या बैठकीला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना मोलाचे सल्ले दिले. ते म्हणाले की, “काही अडचणी असतील, तेथे महायुती तुटली तरी एकमेकांवर जाहीर टीकाटिपण्णी करणे टाळा. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत महायुतीची वज्रमूठ कायम राहणार आहे. राज्यात महायुतीची सत्ता आहे. केंद्रातही आपण सर्व एकत्र आहोत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही आपण एकत्रच लढणार आहोत. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील. असे असले तरी महायुतीचा उमेदवार विरोधात असला तरी एकमेकांवर टीका किंवा आरोप करणे टाळा.”
“आपण आपली केलेली कामे घेऊन मतरादारांकडे जा, आपले ‘व्हीजन’ त्यांना सांगा. मतदार आपल्याला निवडून देण्यास तयार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २०१७ च्या निवडणुकीत भाजपच सर्वात मोठा पक्ष होता. आता आपलाच विक्रम आपल्याला तोडायचा आहे,” असे आवाहन फडणवीस यांनी केले.
विरोधकांचा भर खोट्या ‘नरेटिव्ह’वर
निवडणुका जवळ येऊ लागल्याने विरोधक आता वेगवेगळे ‘नरेटिव्ह’ निर्माण करणार आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात काहीच केले नसल्याने त्यांच्याकडे विकासावर बोलण्यासाठी काहीच नाही. त्यांचा प्रचाराचा सर्व भर खोट्या ‘नरेटिव्ह’वरच राहणार आहे. मराठी-हिंदी भाषेचा वाद हासुद्धा ‘नरेटिव्ह’चा भाग आहे. आपण मराठी भाषा अनिवार्य केली आहे. तिसरी भाषा म्हणून कुठलीही भाषा निवडण्याचा निर्णय घ्यायचा आहे. त्यात हिंदीची सक्ती केली नाही. फक्त तिसरी भाषा कुठली निवडायची एवढाच वाद आहे. मात्र, या वादाला मराठी विरुद्ध हिंदी असा रंग देण्यात आला. पहिले मराठी विद्यापीठ आम्ही अमरावतीमध्ये तयार करतोय. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. ‘ये पब्लिक है, सब जानती है!” अशा शब्दांत त्यांनी उद्धव-राज ठाकरे यांना टोला हाणला.