आमदार नितीन देशमुखांचा सुटून आल्याचा दावा खोटा?
अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख हे गुवाहाटीवरून आपल्या घरी परतल्यानंतर त्यांनी आपण स्वतःची सुटका करून गुवाहाटीवरून पळून आलो, असा दावा केला होता. मात्र, त्यांचा हा दावा खोटा असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. त्यासाठी त्यांनी काही फोटो देखील सादर केले आहेत.
नितीन देशमुख यांचा गुवाहाटी ते अकोला हा परतीचा प्रवास खाजगी विमानाने झाला. एकनाथ शिंदे साहेबांच्या शिलेदारांनी सन्मानाने त्यांना अकोल्याला पोहोचवल्याचा दावा शिंदे गटांनी केला आहे. देशमुख यांना गुवाहाटी येथून विशेष विमानाने नागपूरला सोडण्यात आले.
आपली पत्नी आजारी आहे, मुलांना भेटायचं आहे, अशी कौटुंबिक कारणे त्यांनी दिल्याने त्यांना घरी पाठवण्याची तात्काळ व्यवस्था एकनाथ शिंदे यांनी केली, असेही शिंदे गटाकडून सांगण्यात आले आहे.
जबरदस्तीने ताब्यात ठेवले असते तर नितीन देशमुख यांना परतीच्या प्रवासासाठी तातडीने विशेष विमानाची व्यवस्था केली नसती. गुवाहाटी ते नागपूर या प्रवासात आमदार नितीन देशमुख यांच्यासमवेत त्यांचे मित्र आणि नातेवाईक प्रमोद देशमुख, महादेव गवळे आणि दिलीप बोचे होते. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात त्यांना परत सोडण्यात आले.
ठाण्यातील पदाधिकारी शरद कणसे आणि जेरी डेव्हिड यांनी आमदार नितीन देशमुख यांना नागपूर येथे सुखरूप पोहोचवले, असा दावा शिंदे गटाने केला आहे.