कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा; ६ लाख शेतकऱ्यांना ५ हजार कोटींचे वितरण, महिनाभरात ८० टक्के शेतकऱ्यांना मिळणार लाभ - मुख्यमंत्री

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा; ६ लाख शेतकऱ्यांना ५ हजार कोटींचे वितरण, महिनाभरात ८० टक्के शेतकऱ्यांना मिळणार लाभ - मुख्यमंत्री
कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा; ६ लाख शेतकऱ्यांना ५ हजार कोटींचे वितरण, महिनाभरात ८० टक्के शेतकऱ्यांना मिळणार लाभ - मुख्यमंत्रीप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी राज्यभरातील ६ लाख २२ हजार २०७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५ हजार २९ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली.

कर्जमाफी योजनेसाठी लाभार्थ्यांच्या आधार प्रमाणीकरणाचे काम वेगात सुरू असून महिनाभरात ८० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने'चा आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री, संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी कर्जमाफी योजनेतील पहिल्या हफ्त्याचे वितरण करण्यात आल्याची माहिती दिली.

आषाढी एकादशीला राज्य सरकारने कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची पहिली यादी जारी केली होती. सर्व ग्रामपंचायतींना ही यादी पाठवली. तिथे यादीचे वाचन झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी केवळ आधार प्रमाणीकरण करून, ॲग्रीस्टॅक क्रमांक देण्याची आवश्यकता होती. इतर कोणतीही कागदपत्रे न मागता ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या यादीतील शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाचे काम वेगाने सुरू आहे.

आतापर्यंत आधार प्रमाणीकरण झालेल्या ६ लाख २२ हजार २०७ पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५ हजार २९ कोटींचे वितरण करण्यात आले आहे. जसजशी खाती प्रमाणित होतील तसतशी ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. साधारणपणे महिन्याभरात ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, असे फडणवीस यांनी  सांगितले.

बारा लाख प्रकरणांमध्ये चुका

अद्याप १८ ते १९ लाख खात्यांची प्रक्रिया सुरू आहे, तर जवळपास १२ लाख खात्यांच्या आधार क्रमांकासह अन्य तांत्रिक चुका असून ती यादी बँकांना परत पाठवली आहे. आठवडाभरात या चुकाही दुरुस्त होतील आणि आधार प्रमाणीकरणानंतर या खात्यातही कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे, असे फडणवीस म्हणाले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in