
मुंबई : राज्यभरातील शेतकरी आपल्या मागण्या पूर्ण होत नसल्याने संतापले असून, सरकारचा निषेध करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बुधवारी मंत्रालयावर अर्धनग्न मोर्चा काढणार आहेत.
वाशिम जिल्ह्यातील शेतकरी नेते सतीश इढोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी कर्जमाफी, हमीभाव, वीजबिल माफी, शेतीसाठी पुरेसा पाणीपुरवठा यांसह विविध मागण्या गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत. मात्र, या मागण्यांकडे सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. या कारणामुळे शेतकऱ्यांनी मंत्रालयावर मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली आहे. यात राज्यभरातील शेतकरी सहभागी होणार आहेत.
शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांबद्दल आतापर्यंत विविध आंदोलने केली आहेत. उपोषण, रास्ता रोको, आत्महत्येच्या धमक्या आणि अवयव विक्रीसारख्या टोकाच्या पद्धतींचा अवलंब करूनही शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
यासंदर्भात शेतकरी नेते सतीश इढोळे, बालाजी मोरे आणि विशाल गोटे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा अन्यथा मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.