
मुंबई हे मराठी माणसांचं शहर असल्याचं बोललं जातं. मात्र, वस्तूस्थिती वेगळी आहे. मराठी माणसांना, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या ठिकाणी त्रास दिला जात असल्याचं उदाहरण समोर आलं आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर बेदाणे विक्री करणाऱ्या शेतकऱ्याचा मुलाला स्थानिक प्रशासनाकडून त्रास दिला जात असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी या वादात उडी घेत स्थानिक प्रशानाला इशारा दिला आहे.
सांगलीच्या जत तालुक्यातील प्रशांत पाटील नामक युवक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे बेदाणे विक्री करत असताना स्थानिक प्रशासनाने त्याला बेदाणे विक्री करण्यात मनाई केली आहे. तसंच या युवकाला त्रास देण्यात आला आहे. इतर विक्री करणाऱ्यांना कोण काहीही बोलत नाही. मात्र, या तरुणाला त्रास दिला जात आहे. मुंबईत मराठी माणसालाच धंदा करु दिला जात नाही, असा आरोप या व्हायरल व्हिडिओमधून केला जात आहे.
या तरुणाने देखील या व्हिडिओतून आपली आपबिती सांगितली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यानंतर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्थानिक प्रशासनाला इशारा दिला आहे.
राजू शेट्टी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, "संबंधित बेदाणे विकणाऱ्या तरुण शेतकऱ्यास शेतीमाल विक्रीसाठी पुन्हा काही अडचण आल्यास मला थेट 9822542327, 9922424327 या माझ्या नंबरवरती संपर्क करण्यास सांगा. संबंधित अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाने शेतकऱ्यांना त्रास देऊ नये. अन्यथा तुम्हाला कात्रजचा घाट दाखवावा लागेल", असा इशाराचं राजू शेट्टी यांनी दिला आहे.