‘शक्तिपीठ’विरोधात शेतकरी आक्रमक; कोल्हापुरात महामार्ग रोखला; औरंगाबाद, धाराशीव, लातूरला आंदोलनाची धग

नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात ठिकठिकाणचे शेतकरी अधिकाधिक आक्रमक झाले आहेत. कोल्हापूर, औरंगाबाद, धाराशीव व लातूर येथे शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केले. मंगळवारी कृती समितीच्यावतीने कोल्हापूरजवळ पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग पंचगंगा नदी पुलाजवळ रोखण्यात आला.
‘शक्तिपीठ’विरोधात शेतकरी आक्रमक; कोल्हापुरात महामार्ग रोखला; औरंगाबाद, धाराशीव, लातूरला आंदोलनाची धग
Published on

कोल्हापूर/धाराशिव/लातूर : नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात ठिकठिकाणचे शेतकरी अधिकाधिक आक्रमक झाले आहेत. कोल्हापूर, औरंगाबाद, धाराशीव व लातूर येथे शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केले. मंगळवारी कृती समितीच्यावतीने कोल्हापूरजवळ पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग पंचगंगा नदी पुलाजवळ रोखण्यात आला. ‘एकच जिद्द, शक्तिपीठ रद्द’च्या घोषणा देत जिल्ह्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी महामार्गाला कडाडून विरोध दर्शवला. यामुळे राष्ट्रीय महामार्ग सुमारे २ तास ठप्प झाला होता. काहीही झाले तरी वडिलोपार्जित जमिनी महामार्गाला देणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला. संतप्त शेतकऱ्यांनी पंचगंगेत जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी या शेतकऱ्यांना अडवले.

सांगली-कोल्हापूर मार्गावर रास्ता रोको

शक्तिपीठ महामार्गबाधित शेती बचाव कृती समिती, सांगली यांच्यावतीने सांगली-कोल्हापूर मार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अपक्ष खासदार विशाल पाटील सहभागी झाले. त्यांनी यावेळी सरकारच्या भूमी अधिग्रहणाच्या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला.

पांडुरंगाने, फडणवीसांना सुबुद्धी द्यावी- शेट्टी

“पांडुरंगाने, मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी द्यावी, अन्यथा आम्ही नव्या संघर्षासाठी तयार आहोत. ८६ हजार कोटींचा शक्तिपीठ महामार्ग जनतेच्या पैशातून उभारण्यात येणार आहे. त्यात ५० हजार कोटी हडप केले जाणार आहेत,” असा आरोप शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in