अप्पर वर्धा धरणग्रस्त सरकारविरोधात आक्रमक झाले असून शेतकऱ्यांनी मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उड्या मारुन आंदोलन केलं आहे. शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. आक्रम झालेले शेतकरी धरणग्रस्तांना न्याय देण्याची मागणी करत आहेत. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. धरणग्रस्तांबाबत उद्यापर्यंत निर्णय न घेतल्यास आत्महत्या करण्याचा इशारा आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी दिला आहे.
विदर्भाच्या अनेक भागातून हे शेतकरी मंत्रालयात आले आहेत. सरकार धरणग्रस्तांच्या प्रश्नांबाबत गंभीर नाही, असा आरोप देखील या शेतकऱ्यांनी केला आहे. अप्पर वर्धा धरण हे अमरावतीच्या मोर्शी परिसरात असलेलं धरण आहे. मंत्रालयात आंदोलन करणारे शेतकरी हे १०३ दिवसांपासून मोर्शीच्या तहसिल कार्यालयासमोर आंदोलन करत होते. मात्र, न्याय न मिळाल्याने या शेतकऱ्यांनी थेट मंत्रालयात येऊन आक्रमक पवित्रा घेतला आहे.
यावेळी शेतकऱ्यांनी मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उड्या मारल्या आहेत. यात एका शेतकऱ्याला भोवळ आली असून त्याच्यावर रुग्णलयात उपचार सुरु आहेत. अप्पर वर्धा या १९७२ साली झालेल्या प्रकल्पाचा योग्य मोबदला नाही. तसंच प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळाली नाही. त्यामुळे हे शेतकरी आक्रमक झाले आहे. सरकार आंदोलनाची दखल घेत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.