

मुंबई : कामकाजाच्या वेळेत करण्यात आलेल्या बदलांमुळे आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे शारीरिक तसेच मानसिक त्रास होत असल्याची तक्रार महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) प्रयोगशाळेतील अनेक कर्मचाऱ्यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, या तक्रारीबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांनी फोन किंवा संदेशांना प्रतिसाद दिला नाही, असे ‘पीटीआय’च्या वृत्तात म्हटले आहे.
आपल्या तक्रारीबाबत २७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन मंत्र्यांना सादर करण्यात आले आहे. प्रयोगशाळांमध्ये सुरू करण्यात आलेली दोन शिफ्टची कार्यपद्धती रद्द करावी, शासन निर्णयानुसार पूर्वीचे कार्यालयीन वेळापत्रक लागू करावे आणि शनिवार-रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्या पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नमुन्यांच्या तपासणीचा प्रलंबित भार कमी करण्यासाठी कामाचे तास वाढविण्याऐवजी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही कर्मचाऱ्यांनी केली आहे.
गेल्या महिनाभरापासून आयुक्तांच्या निर्देशानुसार प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांना सकाळी ७ ते दुपारी ३ आणि दुपारी १२ ते रात्री ८ अशा दोन शिफ्टमध्ये काम करावे लागत आहे. तसेच शनिवारीही कार्यालयात उपस्थित राहण्याचे आणि पूर्वपरवानगीशिवाय रजा न घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे.
कर्मचाऱ्यांनी सांगितले की, नव्या व्यवस्थेला पूर्ण सहकार्य करत त्यांनी नियमित क्षमतेपेक्षा अधिक नमुन्यांची तपासणी केली असून, कार्यालयीन वेळेनंतर तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही काम केले आहे.
केवळ कामाचे तास वाढविल्याने उत्पादकता वाढणार नाही, कारण प्रयोगशाळांमध्ये आवश्यक मनुष्यबळ आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, असे कर्मचाऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे.